रविवारी अंनत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मूर्ती कलंडल्याने 17 जण जखमी झाल्याची घटना कांदिवलीच्या चारकोपमध्ये घडली. दरम्यान जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गणपतीची मूर्ती मोठी आणि वजनदार होती. दरम्यान त्या मूर्तीला तडे गेल्याने ती चक्क मिरवणुकीतील नागरिकांवरच कंलडली.
चारकोपच्या गणेशनगरमधील जुनं आणि प्रसिद्ध मंडळ असलेल्या जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळांच्या गणेश मूर्तीचं रात्री उशिरा विसर्जन मिरणूक सुरू होतं. यावेळी शेकडो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मात्र विसर्जनादरम्यान मूर्तीला तडे गेल्यामुळे मूर्ती एका दिशेला नागरिकांवर कलंडली. या दुर्घटनेत 17 जण किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आलं आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली जाणार असल्याचं चारकोप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद धावरे यांनी सांगितलं.