मुंबईसह उपनगरात जून, जुलै, ऑगस्ट या ३ महिन्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसामुळं सखल भागांत पाणी साचल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, या पावसानं सध्या विश्रांती घेतली असली, तरी येत्या गुरुवारी मुंबईसह उपनगरात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली असून गुरुवारी ठाणे आणि मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईला झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरूप धारण करणार आहे. उत्तर भारतातून १९ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तसंच, याचदिवशी मुंबई, ठाणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तसंच, बुधवारी कोल्हापुरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पालघर, रायगड, जळगाव व सातारा या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याच दिवशी कोल्हापुरात अतिवृष्टी होईल. तसंच, गुरूवार १९ सप्टेंबर रोजी मुंबई व ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हेही वाचा -
अमिताभ बच्चन यांचा मेट्रोला पाठिंबा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल