
संदीप हॉटेल परिसरातून हल्ला केल्यानंतर कुत्रा बिरला कॉलेज रोड, जुने आरटीओ कार्यालय आणि भोईरवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती समोर आली. कुत्र्याच्या भीतीमुळे अनेक पालकांनी मुलांना घराबाहेर पडण्यास आणि सोसायटीच्या मैदानात खेळण्यास मनाई केली.
या हल्ल्यानंतर जखमी नागरिकांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी गर्दी केली. महापालिकेच्या नोंदीनुसार, रविवारी रुग्णालयात 58 जणांवर श्वानदंशाच्या उपचारांची नोंद झाली. काही जणांना किरकोळ ओरखडे आणि नखांच्या खुणा होत्या, तर काहींना रक्तस्त्राव आणि गंभीर जखमा झाल्या.
गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतरांना उपचार आणि अँटी-रेबीज लस देऊन घरी सोडण्यात आले.
हल्ल्यात एका 11 वर्षीय मुलीलाही गंभीर दुखापत झाली. तिची प्रकृती आणि जखमांची तीव्रता लक्षात घेऊन तिला पुढील उपचारांसाठी मुंबईतील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयात हलवण्यात आले.
गंभीर जखमा झालेल्या रुग्णांना रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG), तर इतरांना अँटी-रेबीज व्हॅक्सिन (ARV) देण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. आवश्यक लसी आणि इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, या घटनेतील जखमींच्या संख्येवरून आता वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अधिकृत नोंदीनुसार रुक्मिणीबाई रुग्णालयात 58 जणांवर उपचार झाले. मात्र, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पगारे यांनी माध्यमांना 110 ते 130 जणांना कुत्र्याने चावा घेतल्याचे सांगितल्याचे समोर आले आहे.
दोन्ही आकडेवारीत मोठी तफावत असल्याने केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी डॉ. पगारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. या फरकाबाबत 24 तासांत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
माध्यमांना माहिती देताना संबंधित विभागप्रमुख, महापालिका आयुक्त किंवा जनसंपर्क विभागाशी समन्वय ठेवण्याच्या प्रक्रियेबाबतही प्रशासनाने प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्त आहे.
या घटनेनंतर केडीएमसीच्या प्रतिसादावरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक तक्रारी आणि मदतीच्या विनंत्या करूनही कारवाईला विलंब झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. अनेक नागरिकांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कुत्र्याला पकडण्याची मोहीम तातडीने का सुरू करण्यात आली नाही, असा सवालही उपस्थित होत आहे.
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीजविरोधी लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावीतेवरही या घटनेमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
घटनेनंतर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर हर्षाली थवील यांनी पत्रीपुल येथील श्वान निर्बीजीकरण आणि लसीकरण केंद्राची पाहणी केली.
महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावित परिसरात कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेची पथके कार्यरत आहेत. पकडलेल्या कुत्र्यांचे रेबीजविरोधी लसीकरण करण्यात येत असून निर्बीजीकरणाची प्रक्रिया वेगाने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचे मानले जात असलेल्या कुत्र्याला पकडण्यात आले आहे की नाही, याबाबत अधिकाऱ्यांकडून अद्याप स्पष्ट माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या घटनेमुळे दाट लोकवस्तीच्या भागात आक्रमक किंवा रेबीजची शक्यता असलेल्या भटक्या कुत्र्यांबाबत तातडीने कारवाई करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच 58 आणि 110-130 या दोन वेगवेगळ्या आकडेवारीमागचे नेमके कारण काय, याचे उत्तरही आता केडीएमसीच्या स्पष्टीकरणाकडे लागले आहे.
हेही वाचा
