कांदिवलीतील दामू नगरमधील एका कपड्याच्या फॅक्टरीला रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत ही आग आटोक्यात आणली असून या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या ४ जणांचे मृतदेह सोमवारी सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांच्या हाती लागले. राजू विश्वकर्मा (३०), राजेश विश्वकर्मा (३६), भावेश पारेख (५१)आणि सुदामा लल्लनसिंग (३६) अशी या चारजणांची नावे आहेत.
दामू नगरमधील एमआयडीसी बस स्टाॅप जवळ असलेल्या या कपड्याच्या फॅक्टरीला दुपारी साडेतीन वाजता आग लागली. या आगीची वर्दी मिळताच कांदिवली, मालाड, बोरीवली, दिंडोशी आणि गोरेगावी अग्निशमन केंद्रातून एकूण ८ गाड्या तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
लेव्हल २ ची असलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे ७ तास लागले. १०.३२ वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. फॅक्टरीतील कापड आणि लाकडाच्या सामानामुळे आग पसरत गेली होती. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझल्यानंतरही अग्निशमन दलाच्या जवानांकडून दुसऱ्या दिवशी सर्च आॅपरेशन सुरू होतं. त्याच दरम्यान जवानांना हे ४ मृतदेह आढळून आले आहेत.
दामू नगर परिसरात यापूर्वीही मोठ्या आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी कांदिवली पोलिस तपास करत आहेत.
हेही वाचा-
मुंबईत ५ वर्षांत २७०४ बांधकामे काेसळली, २३४ जणांचा बळी
खार पश्चिमेकडील इमारतीच्या तळघरात आग