मुंबईत गोरेगाव येथील दुमजली घर कोसळल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. तर ७ जण जखमी झाले. याच पद्धतीने मुंबईत मागील ५ वर्षांत तब्बल २७०४ बांधकामे कोसळून त्यामध्ये २३४ जणांचा बळी गेल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे. त्यामुळे मुंबईतील धोकादायक आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी २०१३ ते २०१८ पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहेत? त्यात किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले, ही माहिती माहिती अधिकारांतर्गत मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला विचारली होती. त्यावर मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत २०१३ ते जुलै २०१८ पर्यंत इमारत किंवा घर कोसळल्याच्या एकूण २७०४ घटनांची नोंद आहे. या दुर्घटनेत ८४० नागरिक गंभीर जखमी झाले असून तब्बल २३४ जणांचा मृत्यू झाल्याचं पुढे आलं आहे.
गेल्या ५ वर्षांत दहशतवादी हल्ल्यात जितक्या लोकांचा मृत्यू झाला नाही, त्यापेक्षा जास्त मृत्यू इमारती कोसळून झाल्याचं या आकडेवारीवरून पुढे आलं आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारच या घटनांना जबाबदार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना पत्र पाठवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र लिहिल्याची माहिती शेख यांनी दिली.
हेही वाचा-
Video: गोरेगावात दुमजली घर कोसळून तिघांचा मृत्यू
खार पश्चिमेकडील इमारतीच्या तळघरात आग