Advertisement

नागरिकांमध्ये संभ्रम, लसीकरण केंद्रानबाहेर गर्दी


नागरिकांमध्ये संभ्रम, लसीकरण केंद्रानबाहेर गर्दी
SHARES

राज्यभरात शनिवार १मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. राज्य शासनाने ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणं बंधनकारक आहे. त्यानुसार १८ वर्षांपुढील तरुणांनी नोंदणी देखील केली आहे. मात्र, लसीच्या अपुऱ्या साठ्या अभावी मोचक्याच तरुणांना लस दिली जाणार आहे. म्हणजे ज्यांची नोंदणी १ तारखेसाठी झाली त्यांनाच लस दिली जाणार आहे. मात्र काही ज्येष्ठ नागरिकांना लस मिळणार की नाही याबाबत अस्पष्टतता आहे. त्यामुळं विचारणा करण्यासाठी नागरिकांनी वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) जम्बो लसीकरण केंद्राबाहेर गर्दी केली आहे. संताक्रूझच्या सेवेन हिल्स रुग्णालया बाहेर देखील मोठी गर्दी जमली आहे.

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही शासनाची तयारी आहे परंतू लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लगेच लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांनी राज्याची लसीकरणाची क्षमता रोज १० लाख एवढी असली तरी या वयोगटासाठी फक्त ३ लाख डोस राज्याला मिळाल्याची माहितीही दिली. मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने वाढणारी रुग्णसंख्या थोपवण्यासाठी कडक निर्बंधाची आवश्यकता असल्याचे सांगतांना राज्यातील नागरिकांनी करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून राज्य शासनास सहकार्य करण्याचे आवाहन ही केले. तसेच येऊ शकणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी अभिवादन केले.

राज्यात या वयोगटात ६ कोटी नागरिक आहेत त्यांना प्रत्येकी २ डोस म्हटले तरी १२ कोटी लसीची आवश्यकता आहे. आपण दररोज १० लाख लोकांचे लसीकरण करू शकतो एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे परंतू लस वितरण हे ऑक्सीजन आणि रेमडेसीवीर प्रमाणे केंद्र शासनाच्या अखत्यारितील विषय आहे.  राज्याला उपलब्ध होणारी लस ही मर्यादित आहे. त्यामुळे  थेट लस केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, लस केंद्रे ही कोविड प्रसाराची केंद्रे होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. राज्याला जस जशी लस उपलब्ध होईल तस तशी सर्व नागरिकांना लस देण्याची सुनियोजित व्यवस्था करण्यात आल्याचे ते म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा