Advertisement

म्हणून चंद्रपुरातील दारूबंदी उठवली, राज्य सरकारने दिलं 'हे' महत्त्वाचं कारण

चंद्रपुरातील दारूबंदी उठवण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यातच सरकारने हा निर्णय घेण्यामागचं कारण दिलं

म्हणून चंद्रपुरातील दारूबंदी उठवली, राज्य सरकारने दिलं 'हे' महत्त्वाचं कारण
SHARES

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावरून राज्य सरकारवर (maharashtra government) विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यातच सरकारने हा निर्णय घेण्यामागचं कारण दिलं आहे. १ एप्रिल, २०१५ पासून जिल्ह्यात दारुबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारुचं प्रमाण आणि गुन्हेगारी वाढल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

पूर्ण जिल्ह्यात दारूबंदी

फडणवीस (devendra fadnavis) सरकारने १ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्रीचे आणि दारू पिण्याचे परवाने रद्द करून संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. या दारूबंदीच्या अनुषंगाने जुलै, २०१८ मध्ये विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी समिती नेमण्याबाबत आश्वासन दिलं होतं.  त्यानुषंगाने सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तिचा अहवाल ९ मार्च २०२१ रोजी शासनास सादर करण्यात आला.

काळाबाजार वाढला

झा समितीने काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे दारूबंदीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली असून, जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू आणि बनावट दारू काळ्या बाजारात उपलब्ध होत आहे. ही दारू अतिशय घातक आहे. यातून दारूचा काळाबाजार देखील वाढला आहे. शासनाचं वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या महसुलाचं मोठं नुकसान झालं आहे व गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. 

स्त्रीया, मुलांचा सहभाग

बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रीया आणि मुले यांच्या वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झाली आहे. तसंच, दारुबंदीच्या बाबतीत बहुसंख्य संघटना, नागरिक व रहिवाशांनी दारुबंदी मागे घेण्याच्या बाजूने कौल दिला आहे. या कारणांमुळे झा समितीने दारुबंदी उठविण्याबाबत निष्कर्ष काढला आहे.

हेही वाचा- चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवली, सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

गुन्हेगारीत वाढ

दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात असामाजिक प्रवृत्ती व गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. दारूबंदीपूर्वी म्हणजे २०१०-२०१४ या काळात १६ हजार १३२ गुन्हे दाखल झाले होते.  दारूबंदीनंतर म्हणजे २०१५-२०१९ या काळात ४० हजार ३८१ गुन्हे दाखल करण्यात आले.  दारूबंदीपूर्वी १७२९ महिला गुन्हेगारीची प्रकरणे होती. दारूबंदीमध्ये ४०४२ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचा अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली.

दारूबंदीमुळे महसुलात तूट

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीमुळे गेल्या ५ वर्षात १६०६ कोटी रुपये इतकं राज्य उत्पादन शुल्कात नुकसान झालं. तर ९६४ कोटी रुपये विक्रीकर बुडाला, असे एकंदर २५७० कोटी रूपयांचा महसूल शासनास मिळू शकला नाही.

नागरिकांची निवेदने

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी विषयी ग्रामपंचायत, शिक्षक, महिला संघटना, धार्मिक संघटना, कामगार, सामाजिक संघटना, वकील, पत्रकार व सर्वसामान्य नागरिक यांनी २ लाख ६९ हजार ८२४ निवेदने जिल्हाधिकाऱ्यांच्या समिक्षा समितीकडे पाठविली. यातील बहुसंख्य म्हणजे २ लाख ४३ हजार ६२७ निवेदने दारूबंदी उठविण्यासंदर्भात असून, २५ हजार ८७६ निवेदने दारूबंदी कायम राहण्याबाबत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा