मुंबईत येत्या गुढीपाडव्यापासून प्लास्टिकच्या पिशव्या बंद करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आता नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी ज्यूट पिशव्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. कचऱ्यासाठी छोटे कचरा डबे उपलब्ध करून दिल्यानंतर आता प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर केला जावा, यासाठी आता महापलिकेने पुढाकार घेतला आहे.
मुंबईत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना बंदी असून नागरिकांनी यापेक्षा अधिक जाडीचा वापर करण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे. परंतु, ही बंदी घालूनही ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर आजही सर्रासपणे सुरू आहे. या कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्या फेरीवाल्यांसह व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.
प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणून येत्या गुढीपाडव्यापासून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याचं राज्याच्या पर्यावरण खात्याने स्पष्ट केलं आहे. एका बाजूला प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली जात असताना मुंबई महापालिकेने सभागृहनेते यशवंत जाधव प्रभाग क्रमांक २०९ साठी ३० लाख रुपये तर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रभाग क्रमांक ११४ साठी ५० लाख रुपयांची तरतूद नागरिकांना कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे.
स्थायी समितीच्या अधिकारात या दोन्ही शिवसेनेच्या महापालिकेतील नगरसेवकांनी कापडी पिशव्यांसाठी भरीव निधीची तरतूद करून या पिशव्या नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला तरी शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांकडून महापालिका सभागृहाच्या अधिकारात मिळणाऱ्या अर्थसंकल्पीय निधीतून कापडी ज्युट पिशव्यांसाठी तरतूद केली जाणार आहे. शिवसेना अपक्षांसह आपल्य ९४ नगरसेवकांना कापडी ज्यूट पिशव्यांसाठी तरतूद करण्याच्या सूचना पक्षाच्यावतीने करण्यात आल्याचं समजतं.