राज्यात १५ ऑगस्टपासून दुकानं, उपाहारगृहं आणि मॉल्स आठवड्याचे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला.
नव्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र दुकानं रात्री १० पर्यंत खुली राहतील. मॉल्सनाही रात्री १० पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मॉलमध्ये प्रवेश करताना लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे.
उपाहारगृहे सायंकाळी ४ पर्यंत खुली ठेवण्यास सध्या परवानगी आहे. ही वेळ रात्री उशिरापर्यंत वाढवून देण्याची मागणी उपाहारगृहांच्या संघटनेकडून करण्यात येत होती. उपाहारगृहे रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. बारही रात्री १० पर्यंत खुले राहू शकतील.
खुले प्रांगण किंवा लॉनमध्ये होणाऱ्या विवाह समारंभात क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २०० जणांना परवानगी दिली जाईल. बंदिस्त मंगल कार्यालयांमध्ये १०० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. सध्या ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व मैदानं, उद्यानं, चौपाट्या, समुद्र किनारे स्थानिक प्राधिकरणानं निश्चिात केलेल्या वेळेत सुरू करता येतील. व्यायामशाळा, ब्युटी पार्लर, स्पा आदी रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मैदानी खेळाबरोबरच इनडोअर खेळांनाही मुभा असेल.
राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या अंगलट आला आहे. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण झालेलं नसतानाही त्यांना शाळेत बोलावणं धोक्याचं असल्याची भूमिका घेत कृतिदलानं शाळा सुरू करण्यास विरोध दर्शवला.
धार्मिक स्थळे तूर्तास बंदच राहतील. सणासुदीचे दिवस असल्यानं मंदिरं उघडल्यास गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊनच धार्मिक स्थळे आताच खुली न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. नाट्यगृहे सुरू करण्यासाठी रंगकर्मींनी आंदोलनही केले होते. मात्र, याबाबत सरकारनं सावध पवित्रा घेतला आहे. काही क्षेत्रांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत असली तरी संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
गर्दी टाळण्यासाठी खासगी कार्यालये २४ तास खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कार्यालयांमध्ये एका सत्रात फक्त २५ टक्क्यांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीस परवानगी असेल.
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं निर्बंध शिथिल करण्यासाठी जनमताचा रेटा वाढला होता. लसीकरण पूर्ण झालेल्यांना रेल्वे प्रवासास परवानगी देण्याबाबत विचार करण्याची सूचना उच्च न्यायालयानं केली होती. अखेर रेल्वे, दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स आदी सुरू करून अर्थचक्र अधिक गतिमान करण्याबरोबरच राज्यातील सामान्य जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलासा दिला आहे. १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल होणार आहेत.
हेही वाचा