लॉकडाऊनचा कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार सध्या लावण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याच्या दिशेने पावलं उचलणारच आहे. त्या दृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे, असा स्पष्ट इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी बुधवारी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राजेश टोपे यांना लाॅकडाऊन लावण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर खुलासा करताना ते म्हणाले की, लाॅकडाऊनच्या बाबतीत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याबाबतची चर्चा निश्चितपणे वेगवेगळ्या प्रकारे सुरू असते. सध्या लावण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याच्या दिशेने राज्य शासन पावलं उचलणारच आहे. त्या दृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे.
गर्दी टाळावी हाच त्यामागचा मुख्य दृष्टीकोन आहे. त्यामुळे गर्दी होणारी जी जी ठिकाणं आहे, तिथं अधिक कडक निर्बंध आणण्याच्या दृष्टीने आपण नियोजन करत आहोत. ते नक्की झालं, की त्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येतील.
हेही वाचा- पुन्हा लाॅकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका- संजय निरूपम
नियम पाळा आणि लॉक़डाऊन टाळा
— NCP (@NCPspeaks) March 31, 2021
लॉकडाऊनचा कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 यांनी स्पष्ट केले. #CoronaUpdate pic.twitter.com/ZopbCqmgTE
सोशल डिस्टन्सिंग स्ट्रिक्टली मेंटेन व्हावंच यासाठी जे पावलं उचलायची आहेत, त्यासंदर्भातलं नियोजन हे नेहमी चालूच असतं. गरजेप्रमाणे त्याबाबतचे नोटिफिकेशन्स वेळोवेळी निर्गमित केले जातात. तर आताच्या काळात १५ मार्चला आणि तीन दिवसांपूर्वी असे दोन नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत. कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या अशीच राहणार असेल आणि लोक बेफिकिरीने वागणार असतील, तर निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय आपल्याला घ्यावाच लागेल. लाॅकडाऊन जर टाळायचं असेल तर नियम पाळा आणि लाॅकडाऊन टाळा, असंच मला या निमित्ताने सांगायचं आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
राज्यात कोरोनाचे बेड्स सर्वत्र उपलब्ध आहेत. काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर बेड्स वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसंच ऑक्सिजनचा वापर ८०% आरोग्यासाठी व २०% उद्योगासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत.
लसीकरणातही राज्यात वेग आणला असून सार्वत्रिक प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे, येत्या काही दिवसांत रुग्णसंख्या नक्कीच कमी होईल, असा विश्वास आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
(maharashtra health minister rajesh tope clarify on lockdown and strict restrictions)