पालघर जिल्ह्यातील सातपाटी या गावचे रहिवासी असलेले मिलन शंकर तारे यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय समुद्री शोध आणि बचाव पुरस्कार दिला जाणार आहे. ५ जुलै २०१८ रोजी दिल्ली येथे होणाऱ्या १७ व्या नॅशनल मेरीटाईम सारा बोर्डाच्या (एनएमएसआरबी) कार्यक्रमात या पुरस्काराचं वितरण होणार आहे. प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे.
९ मे २०१८ रोजी बोटीतून पहाटे ३ वाजता मासेमारीहून आपल्या बोटीतून परत येत असताना तारे यांना समुद्रात काही मानवी हालचाली दिसल्या. कुणीतरी संकटात असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी लगेच आपली नाव आवाजाच्या दिशेनं वळवली. त्यावेळी खूप अंधार असल्यामुळे ते नेमके कुठे अडकले आहेत हे त्यांना कळणं कठीण होतं. मात्र, आपल्या अनुभवाचा वापर करून त्यांनी हालचालीच्या दिशेने त्यांची बोट नेली. इतर काही नावाड्यांनाही त्यांनी सोबत घेतले होते. शिवनेरी नावेजळ ते पोहचले असता ती नाव बुडत असल्याचे त्यांना दिसून अाले.
बोटीतील १२ जण थर्मोकोल, टायर यांच्या सहाय्याने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. तारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या १२ जणांना आपल्या बोटीत घेऊन सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. मिलन तारे यांनी दाखवलेल्या धाडसाचा आणि निस्वार्थ वृत्तीच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
हेही वाचा -
मुंबई-नागपूर मार्गावर 50 ई-चार्जिंग स्टेशन
भारतीय शिक्षण संस्थानी जागतिक स्पर्धेसाठी सज्ज व्हावं- राज्यपाल