Advertisement

मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमान

मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे.

मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमान
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना थंडीची चाहुल लागली आहे. मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत सोमवारी यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळं मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी थंडीचा अनुभव घेतला.

प्रामुख्यानं मुंबई परिसर आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा घसरल्यानं या भागाला हुडहुडी भरली आहे. पुढील २ दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या बाष्पामुळं राज्याच्या बहुतांश भागांत २ दिवसांपर्यंत पावसाळी स्थिती होती. सध्या बहुतांश भागात कोरड्या हवामानाची स्थिती आहे. तुरळक ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ आहे.

सध्या गुजरात आणि मध्य प्रदेशात अनेक भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. या भागांतून वारे येत असल्याने राज्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. सोमवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जळगावात ९ अंश किमान तापमान नोंदविले गेले. 

मुंबई आणि परिसरासह सर्व कोकण विभागातही तापमानात मोठी घट झाली आहे. दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊन चांगलाच गारवा अवतरला आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, नगर आदी भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळ येऊन रात्रीचा गारवा वाढला आहे.

मरावाड्यातही तापमानात घट झाली आहे. ११ ते १५ या कालावधीत उत्तरेकडील काही राज्यांत थंडीच्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यातील तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात २ ते ३ दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा