नोकरदारांना घरचा ताजा, सकस आणि गरम जेवणाचा डबा कार्यालयात नेऊन देणारे डबेवाले सहा दिवस सुट्टीवर जाणार आहेत. डबेवाले ३ ते ८ एप्रिल या कालावधीत सुटी घेणार असल्याने नोकरदारांना या कालावधीत घरचा गरम जेवणाचा डबा मिळणार नाही. हे डबेवाले आपापल्या गावी होणाऱ्या यात्रांसाठी रवाना होणार आहेत.
नोकरदारांना घरचे ताजे अन्न कार्यालयात पोहोचवण्याचे काम डबेवाले कित्येक वर्षांपासून नित्यनेमाने करत आहेत. घरोघरी जाऊन ताजे जेवणाचे डबे घेऊन ते कार्यालयात पोहोचवण्याचे काम ते करतात. यातील बहुतांश डबेवाले हे राज्याच्या ग्रामीण भागातील आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.
त्यामध्ये मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर या भागातील डबेवाल्यांची संख्या मोठी आहे. आता ग्रामीण भागात यात्रांना सुरुवात झाली आहे. ३ ते ८ एप्रिल या काळात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांच्या यात्रा पार पडणार आहेत. त्यामुळे डबेवाल्यांनी या काळात सुट्टी घेतली आहे.
१० एप्रिलपासून त्यांची सेवा पूर्ववत होईल. यामुळे नोकरदारांची होणारी गैरसोय लक्षात घेत मुंबई डबेवाला असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे. ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी विनंती 'मुंबई डबेवाला असोसिएशनचे' अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.
हेही वाचा