रेल्वे कायद्यानुसार अंधेरी पादचारी पूल दुर्घटनेची जबाबदारी पूर्णपणे रेल्वे प्रशासनाचीच असल्याचं मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ठामपणे सांगितलं अाहे. अंधेरी पूल दुर्घटनेबाबत उच्च न्यायालयानं मत व्यक्त केलं आहे, निर्णय दिलेला नाही, असं स्पष्ट करत महाडेश्वर यांनी महापालिकेची बांधिलकी ही जनतेशी, असं म्हटलं आहे.
अंधेरीतील गोपालकृष्ण गोखले उड्डाणपूलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जबाबदारीच्या टोलवा टोलवीवरून उच्च न्यायालयानं महापालिका आणि रेल्वेला खडसावून ही जबाबदारी महापालिकेचीच आहे, असंही सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना महापौरांनी दुर्घटनेची जबाबदारी रेल्वेचीच असल्याचं ठासून सांगितलं.
महापालिकेची बांधिलकी ही जनतेशी आहे आणि याप्रकरणी महापालिका न्यायालयात आपली बाजू मांडेल. राज्य सरकारने विविध प्राधिकरणे तयार करून त्यांना अधिकार दिले अाहेत. मुंबई महापालिकेचे अधिकार कमी केले आहेत. हे राज्य सरकारचं चुकीचं काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्राधिकरणांनी कामं योग्य पद्धतीने केली नाहीत तर त्याचा दोष फक्त महापालिकेवर टाकणे संयुक्तिक ठरणार नाही, असंही महापौरांनी म्हटलं.
प्राधिकरण व्यवस्थित काम करीत आहे की नाही याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. आम्ही आमची जबाबदारी झटकत नाही आणि आम्हाला याचं राजकारणही करायचं नाही, असंही महापौरांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे बुधवारी भाजपा, सपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रशासनावर हल्ला चढवत, महापौरांना चुकीची माहिती देऊन ते राजकीय पक्षांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. परंतु महापौर आपल्या विधानावर कायम असल्याने या पूल दुर्घटनेची खापर महापालिकेच्या खांद्यावर फोडण्याचा स्थायी समितीचा प्रयत्न विफल ठरवला.
हेही वाचा -
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
'एमपीएस' शाळेवरून माझ्या बदनामीचं षडयंत्र- नगरसेविका राजूल पटेल