मुंबईत तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसात कसलीही तमा न बाळगता खाकी वर्दीतले पोलिस कंबरेइतक्या पाण्यात नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर होते. या पावसात बरेच पोलिस आता आजारी पडू लागले आहेत. या गोष्टीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानी आपल्या कर्मचाऱ्यांना अशा परिस्थितीत काेणती औषधं घ्यावीत, यासाठी सूचना केल्या अाहेत.
मुंबईत ८ जुलै ते १० जुलै रोजी मुसळधार पाऊस पडला. साचलेल्या पाण्यात अडकलेल्यांसाठी मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यातील कर्मचारी रस्त्यावर उतरले. मात्र कित्येक तास पाण्यात उभे राहिल्याने अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना आजाराला सामोरे जावे लागले. मुंबईतील हिंदमाता, सायन सर्कल आणि माटुंगा परिसरात तुंबलेल्या पाण्यात मदतीसाठी उतरलेल्या माटुंगा पोलिस ठाण्यातील ८ पोलिसांना थंडी, ताप व संसर्ग झाला आहे. तर सायन पोलिस ठाण्यातील ज्ञानेश्वर देशमुख (५०) हे सकाळी साच वाजल्यापासून दुपारपर्यंत पाण्यात उभे राहिल्याने त्यांच्या पायाच्या बोटांमध्ये जखमा झाल्या होत्या. तर भोईवाडा पोलिस ठाण्यातील एका महिलेला अशक्तपणाचा त्रास झाल्याचे समोर आले आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेेल्या या सेवेचे वरिष्ठांनी कौतुक केले खरे, पण त्याचबरोबर त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत आवश्यक उपचाराबाबत सूचनाही केल्या आहेत.
दक्षिण मुंबईत हिंदमाता, माटुंगा आणि किंग्ज सर्कल परिसरात सर्वाधिक पाणी तुंबते. या पाण्यात पोलिस तासनतास उभे राहून नागरिकांची मदत करतात. त्यामुळे अनेक कर्मचारी आजारी पडतात. त्यामुळे ते आजारी पडू नयेत, यासाठी त्यांना योग्य ते औषधोपचार घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
- एन. अंबिक, पोलिस उपायुक्त, झोन ४
हेही वाचा -
बँकेतील महिलाच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात, १ लाखाला गंडवलं
धक्कादायक! मुंबईत मुलींच्या अपहरणात वाढ