मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. पावसाच्या विश्रांतीमुळं मुंबईत तापमानात बदल झाला असून, उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र सोमवारी मुंबईकरांना पावसानं दिलासा दिला. रविवारची सुटी संपवून ऑफिसच्या तयारीत असलेल्या मुंबईकरांना घड्याळाचा अलार्मऐवजी ढगांच्या गडगडाटानं जाग आली.
गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पाऊस सोमवारी पहाटेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईत धडकला. एरवी शांत संयमानं बसणारा पाऊस यावेळी विजांच्या कडकडातच दाखल झाला. त्यामुळे काही दिवसांपासून गर्मीनं त्रस्त झालेल्या मुंबईकरांची पहाटेच्या गारव्यानं सुटका केली.
जुलै-ऑगस्टमध्ये मुंबईसह राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मागील पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. रविवारी उकाड्यात प्रचंड वाढ झाल्यानंतर सोमवारी पहाटे पावसानं मुंबईत पाऊल ठेवलं.
पहाटे ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता. त्यानंतर मात्र, वाढतच गेला.