मुंबईत मागील काही दिवसांपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं. विशेष म्हणजे या मुसळधार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये तब्बल ५१ हजार ६८५ दशलक्ष लिटर (एमएलडी) म्हणजे ५१६८ कोटी लिटर पाण्याची वाढ झाली आहे.
मुंबईला दररोज सरासरी ३८५० एमएलडी (३८५ कोटी लिटर) पाणीपुरवठा केला जातो. ही बाब लक्षात घेता दोन दिवसांत सुमारे १३ दिवसांच्या पाणीसाठ्याची पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव असून, यापैकी पाच तलाव पालिकेचे आहेत, तर दोन तलाव हे राज्य सरकारच्या अखत्यारितील आहेत.
४ जुलै रोजी सर्व तलावांतील एकूण पाणीसाठा १ लाख ९ हजार ७ दशलक्ष लिटर एवढा होता. तर ६ जुलै रोजी हा पाणीसाठा १ लाख ६० हजार ६९२ दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा कमी आहे. गेल्या वर्षी ६ जुलै रोजी ७ ही तलावांचा एकूण पाणीसाठा हा २ लाख १६ हजार ५२२ दशलक्ष लिटर होता.
यंदाच्या तुलनेत ५५ हजार ८३० दशलक्ष लिटरनं अधिक होता. तर ६ जुलै, २०१८ रोजी तो ३ लाख ५५ हजार ३६० दशलक्ष लिटर इतका होता. गेल्यावर्षी १२ जुलै, २०१९ रोजी तुळशी तलाव पूर्ण भरून वाहू लागला होता. त्यानंतर २५ जुलै रोजी तानसा, २६ जुलै रोजी मोडक सागर, ३१ जुलै रोजी विहार, २५ ऑगस्ट रोजी मध्य वैतरणा आणि ३१ ऑगस्ट रोजी अप्पर वैतरणा तलाव भरून वाहू लागले होते.
पाणीसाठ्यात वाढ
हेही वाचा -
Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित
डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय