Advertisement

स्वच्छता सर्वेक्षणाच्या मतदानामध्ये मुंबईकर मागे

यंदाही मुंबईकर स्वच्छता सर्वेक्षणाच्या मतदानामध्ये मागे राहिले आहेत.

स्वच्छता सर्वेक्षणाच्या मतदानामध्ये मुंबईकर मागे
SHARES

यंदाही मुंबईकर स्वच्छता सर्वेक्षणाच्या मतदानामध्ये मागे राहिले आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात अव्वल ठरण्यासाठी अन्य शहरांतील नागरिक प्रचंड मतदान करीत आहेत. मात्र, मुंबईत व्होटिंगचं प्रमाण खूप कमी आहे. मुंबईतील १ टक्का लोकांनी मुंबईसाठी मतदान केल्याची माहिती समोर येत आहे. मतदान कमी होत असल्यानं मुंबईच्या रँकिंगवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारमार्फत दरवर्षी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सर्व शहरांचं सर्वेक्षण केलं जातं. मागील वर्षी महापालिकेचे रँकिंग घसरून ४९ क्रमांक आला होता. या स्पर्धेत मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराला इंदौर, नवी मुंबईनं मागे टाकलं होतं. परंतु, मुंबईची रेटिंग घसरण्यामागे अन्य कारणांबरोबरच नागरिकांकडून मिळणाऱ्या मतांचं अत्यल्प प्रमाण हेदेखील प्रमुख कारण होते.

या वर्षी अ‍ॅप, संकेतस्थळ अशा माध्यमांतून १ ते ३१ जानेवारी या कालावधीत मतदान करण्याचं आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केलं आहे. परंतु, १५ जानेवारीपर्यंत केवळ १ लाख ३० हजार ९२५ लोकांनीच मतदान केलं आहे. हे प्रमाण मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत फारच कमी आहे. या स्पर्धेत मुंबईचे प्रतिस्पर्धी असलेल्या, परंतु तुलनेने फार कमी लोकसंख्या असलेल्या शहरांनी मतदानामध्ये मुंबईला मागे टाकलं आहे.

मतदानाचं प्रमाण वाढविण्याकरिता महाविद्यालय, सोसायट्या आणि झोपडपट्टी भागातही पालिकेचे अधिकारी जनजागृती करीत आहेत. मागील वर्षी मतदान श्रेणीत मुंबईला १२५० पैकी ८४८ गुण मिळाले होते. या वर्षी महापालिकेनं पंचतारांकित रेटिंगसाठी अर्ज केला आहे. या स्पर्धेत दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रेणीत मुंबई, आग्रा, विशाखापट्टणम, कानपूर, गाजियाबाद, विजयवाडा अशी शहरे आहेत.

यापैकी आग्रा आणि विशाखापट्टणममध्ये १० टक्के मतदान झालं आहे. स्वच्छता हेल्पलाइन १९१६ किवा अ‍ॅप, संकेतस्थळ यावर नागरिक मुंबईसाठी मत करू शकतात. सार्वजनिक शौचालयाची अवस्था, सार्वजनिक आणि व्यावसायिक ठिकाणी सफाई, कचरा वर्गीकरण आणि स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जागृती याआधारे मतदान करावं लागतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा