राज्यातील (maharashtra) विविध 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजित केले आहे. पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये पंचायत समिती, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याची चाचपणी सुरू आहे.
नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदांच्या, तर सर्वांत शेवटी डिसेंबरमध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेसह (bmc) ठाणे, वसई-विरार, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई अशा अनेक महानगरपालिकांचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVM) मर्यादित संख्या पाहता राज्य निवडणूक आयोगाने एकाच वेळी या निवडणुका घेण्यास असमर्थता दर्शविल्याची चर्चा आहे.
राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेणे ईव्हीएमच्या दृष्टीने अडचणीचे ठरले आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मिळून 687 संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.
त्यासाठी मोठ्या संख्येने 'ईव्हीएम' लागणार असून, त्याचा आढावा घेण्यात येत आहे. 'ईव्हीएम'ची संख्या अपुरी असल्याने या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजन असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवले आहे. 11 जुलै रोजी व्हिडिओ कान्फरसिंगद्वारे बैठक बोलावली आहे. त्यामध्ये मतदार संख्या, मतदान केद्रांची संख्या, ईव्हीएम, आवश्यक मनुष्यबळ तसेच ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येईल, असे पत्र निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठवले आहे.
हेही वाचा