कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर 3 मे पर्यत लॉकडाऊन आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेकडून नवी मुंबईकरांच्या दारात भाजीपाला पोहचत आहे. यासाठी पालिकेने भाजीपाला अॅप सुरू केलं आहे. या अभिनव उपक्रमाला नागरिकांनी चागंला प्रतिसाद दिला आहे. महापालिकेकडे 1200 सोसायट्यांनी अॅपवर नोंदणी करत भाजीपाला गाड्यांची मागणी केली आहे. Navi Mumbai Bazzar या नावाचं हे अॅप आहे.
महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची ही भाजीपाला अॅपची संकल्पना आहे. महापालिकेकडून शहरातील सर्व भागात स्वस्त भाजीपाला गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. अॅपच्या माध्यमातून सोसायटींनी भाजीपाला गाडीची मागणी केल्यास महापालिका आपल्या गाड्या संबंधीत सोसायटीमध्ये पाठवतात. शेतकरी वर्गाकडून थेट घेतलेला भाजीपाला लोकांना आपल्या दारात स्वस्तात मिळत असल्याने त्यांना बाहेर पडायची गरज लागत नाही. तसंच यामुळे मुख्य बाजारपेठेतील गर्दी नाहीशी झाली आहे. सोशल डिस्टन्स ठेवून रहिवाशी भाजीपाला घेत आहेत.
कोरोनोचा संसर्ग पसरण्याची भीती भाजीपाला मार्केटमुळे निर्माण झाली होती. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शेतकरी ते ग्राहक असे थेट नियोजन केले आहे. या योजनेंतर्गत शेतकरी, पुरवठादार आणि ग्राहक (खरेदीदार) यांच्यात समन्वय करत हा भाजीपाला पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक व्यवस्था असलेली वाहने निर्जंतुकीकरण करून मालाचा पुरवठा केला जाणार आहे. मास्क, हॅण्डग्लोज आदी सुरक्षा सुविधाही दिल्या जाणार असून सोसायटीच्या दारात हा भाजीपाला विक्री केला जाणार आहे. ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना 15 फुटांचे अंतर ठेवून खरेदी करावा लागणार आहे. यामध्ये टोकन पद्धत राबवली जाणार असून डिजिटल पेमेंट सुविधाही असणार आहे.
हेही वाचा -