नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी गुरूवारी २४ जून रोजी १ लाख प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सिडकोला घेराव घालणार आहेत.
एवढा मोठा मोर्चा निघणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत.
तसंच नवी मुंबई आणि पनवेल मध्ये ५ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथून पोलीस नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसंच राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ५०० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकारी आंदोलन हाताळण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
२४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसंच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येतील.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने सावध भूमिका घेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत ४ जुलैपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम (३७) (१) (३)नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना जमण्यास, पोलिस आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा व मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य, दगड, अथवा शस्त्रे, त्याचप्रमाणे सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टा, देशी-विदेशी बंदुका, शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी कोणतीही वस्तू बाळगता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असे वर्तन न करण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -