
राज्यात विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान (IT) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विभाग स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे राज्यात स्वतंत्र IT कॅडर तयार करण्यात येणार आहे. मंत्रालय, आयुक्तालय आणि सर्व जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी पदे निर्माण केली जाणार आहेत. आतापर्यंत सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असलेला IT विभाग वेगळा करून नवीन विभाग स्थापन केला जाणार आहे.
तसेच माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर करून नवीन इलेक्ट्रॉनिक्स, IT आणि AI आयुक्तालय तयार केले जाईल, ज्यासाठी 77 पदे निर्माण केली जातील.
याशिवाय, मंत्रालय, विविध प्रशासकीय विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये IT कामकाज पाहण्यासाठी 427 पदांचा स्वतंत्र IT कॅडर तयार होणार आहे.
प्रकल्प व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी 389 तांत्रिक पदांची भरती बाह्य यंत्रणेद्वारे केली जाईल. यासाठी महाराष्ट्र ई-मिशन टीम (MEMT) स्थापन केली जाणार आहे.
राज्यातील अभियंता विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी 200 विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रमही राबवला जाणार आहे. या नव्या विभागामुळे नागरिकांना अधिकाधिक सरकारी सेवा ऑनलाइन मिळतील, ई-गव्हर्नन्स मजबूत होईल आणि प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम होण्यास मदत होईल. तसेच डेटा-आधारित निर्णय, सायबर सुरक्षा, संशोधन आणि नवतंत्रज्ञानाचा वापर वाढेल.
या सर्वासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासाठी दरवर्षी सुमारे 133 कोटी 35 लाख रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
हेही वाचा
