मुंबईच्या २०१४-३४च्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली खरी पण ही मंजुरी देताना महापालिकेच्या नियोजन समितीसह महापालिका सभागृहाने सुचवलेल्या तब्बल २ हजार ७०० पैकी २ हजार सूचना आणि बदल स्वीकारले आहेत. त्यामुळे सुमारे ६००सूचना आणि बदलांना वगळून त्याठिकाणी काही पूर्वव्रत तर काहींमध्ये मोठ्याप्रमाणात बदल करत नियोजन समिती आणि महापालिकेच्या सूचनांना केराची टोपली दाखवली आहे.
मुंबईचा प्रारुप विकास आराखडा आणि प्रारुप विकास नियंत्रण नियमावली प्रसिध्द करण्यात आल्यानंतर याबाबतच्या हरकती आणि सूचनांना सुनावणी देण्यासाठी ६ सदस्यीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. या नियोजन समितीने हरकती आणि सूचनांची सुनावणी घेऊन तब्बल २ हजार ४०० सूचना व बदल सुचवले होते. त्यानंतर हा आराखडा महापालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात आल्यानंतर सभागृहानेही त्यामध्ये २६६ सूचना व बदल सूचवून त्याला मंजुरी दिली.
नियोजन समितीने सुचवलेल्या बदल आणि सूचनांपैकी केवळ १९६६ सूचनांचा विचार सरकारने मंजूर केलेल्या या विकास आराखड्यात करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल ४४० सूचना व बदल रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये सभागृहाने २६६ सूचना व बदल सूचवले होते. पण यापैकी १०४ सूचना व बदल स्वीकारण्यात आले असून १६२ सूचना व बदल विचारातच घेण्यात आलेलं नाही. त्या सूचना बाद करण्यात आल्या आहेत. या विकास आराखड्यात जे काही किरकोळ तसेच मोठ्याप्रमाणात बदल केले आहेत, त्यासर्व बदलांबाबत नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा आराखडा पुन्हा प्रकाशित करण्यात येणार असून यामाध्यमातून नागरिकांना आपल्या हरकती व सूचना नोंदवता येणार आहे.