दिवाळीत समुद्र किनारी, मोकळ्या जागेत आकाश कंदील उडवणं सगळ्यांनाच आवडतं, त्यानुसार यावर्षी तुम्ही अाकाश कंदील उडवणार असाल, तर जरा थांबा. कारण अशाप्रकारे कंदील उडवल्यास तुम्हाला थेट तुरूंगाची हवा खावी लागू शकते. मुंबई पोलिसांनी आकाश कंदील उडवणे, जवळ बाळगणे किंवा त्यांची विक्री करण्यावर बंदी घातली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देवराज (ऑपरेशन्स) यांनी हे आदेश काढले असून १६ ऑक्टोबर ते १४ नाेव्हेंबरपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.
सीआरपीसीच्या कलम १४४ अंतर्गत हे आदेश काढण्यात आले असून या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना २०० रुपये दंड तसेच १ महिन्यापर्यंत शिक्षा देखील होऊ शकते.
दिवाळीत किंवा विशेषकरून मकरसंक्रांतीला असे आकाश कंदील उडवले जातात. मेणबत्ती किंवा दीवा असे ज्वलनशील पदार्थ तळाशी ठेऊन हे कंदील आकाशात उंच उडवले जातात. हवेवर स्वार होणारे हे कंदील उंच आकाशात गेल्यावर कुठे जाऊन थडकतील त्याचा काही नेम नसतो.
आकाश कंदीलचा धोका मुख्यत्वेकरून उंच इमारतींना अधिक असतो. दक्षिण मुंबईतील एका इमारतीत आकाश कंदीलमुळे भीषण आग देखील लागली होती. दरवर्षी दिवाळीत आकाश कंदीलांमुळे आगीच्या सरासरी ४० घटना घडतात. त्यामुळेच गेल्यावर्षी देखील आकाश कंदील उडवण्यास मुंबई परिसरात बंदी घालण्यात आली होती.
आकाश कंदीलांवर मुंबई परिक्षेत्रात असलेली बंदी रॉकेट, पॅराशूट आणि इतर फटाक्यांना लागू होत नसल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते दीपक देवराज यांनी दिली.
हेही वाचा -
फक्त बांबूचा कंदील नव्हे, हा तर 'त्यां'च्या आयुष्यातला प्रकाश!
मुंबईतल्या दिवाळीचे खरे कलाकार धारावीत!