गेल्या आठवड्यात 29 ऑगस्टला मुंबईत अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका मुंबईतील जुन्या-जीर्ण उपकरप्राप्त इमारतींना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. त्यामुळेच अतिवृष्टीनंतर काही तासांतच, गुरुवारी भेंडीबाजारमधील हुसैनीवाला इमारत कोसळली आणि त्यातच 33 जणांचा बळी गेला. तर जुन्या-जीर्ण इमारतींची माती पडण्याच्या, स्लॅबचा भाग कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. दरम्यान बुधवारी मध्यरात्री डोंगरीतील एका इमारतीची माती पडू लागल्याने म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने या इमारतीतील रहिवाशांना तात्काळ स्थलांतरीत केले आहे.
डोंगरी येथील 25 सी निशानपाडा क्रॉस लेन (केसरबाई बिल्डींग)या धोकादायक उपकरप्राप्त इमारतीची दुरुस्ती म्हाडाच्या दुरूस्ती मंडळाकडून करण्यात येत आहे. यासाठी 21 जुलै 2017 मध्ये सुबोध के. तारी या आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली. पण आर्किटेक्टने टाळाटाळ केल्याने दुरुस्ती रखडली ती रखडलीच. बुधवारी मध्यरात्री रहिवाशांनी या इमारतीची माती कोसळत असल्याची तक्रार म्हाडाकडे केली. दुरूस्ती मंडळाने तात्काळ या तक्रारीची दखल घेत मध्यरात्रीच या रहिवाशांना स्थलांतरीत करण्यास सुरूवात केली.
ही चारमजली इमारत असून यात 48 निवासी तर 2 अनिवासी गाळे आहेत. या सर्व रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तर या इमारतीच्या दुरूस्तीसाठी आता नव्याने आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली असून आता लवकरच दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
अतिवृष्टीनंतर जीर्ण-जुन्या इमारतीसंदर्भातील तक्रारी वाढल्याची माहिती म्हाडाच्या नियंत्रण कक्षातील एका अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. दररोज तीन ते चार तक्रारी येत असून या तक्रारी सोडवल्या जात असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. धोकादायक-अतिधोकादायक इमारती दुरुस्ती पलिकडे गेल्याने आता पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचे धोरण त्वरीत जाहिर करत पुनर्विकास मार्गी लावावा अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
हेही वाचा
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)