जम्मू आणि काश्मिरच्या कठुआ कांडात ८ वर्षांच्या चिमुरडीवर सामुहीक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त होत असताना मुंबईतही शुक्रवारी आझाद मैदानावर विविध संघटनांनी एकत्र येत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. आसिफा हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है, आसिफाला न्याय मिळालाच पाहिजे, असं म्हणत उन्नाव आणि कठुआ या दोन्ही बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी उचलून धरली.
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये वर्षभरापूर्वी १६ वर्षीय मुलीवर सामुहीक बलात्कार झाला होता. उन्नावमधील भाजपाचा आमदार कुलदीप सिंग सेंगर आणि त्याच्या भावाने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा खटला मागे घेण्यासाठी पीडितेवर आणि तिच्या कुटुंबियांवर आरोपींकडून दबाव आणण्यात येत होता. पण या दबावाला बळी न पडणाऱ्या पीडितेच्या वडिलांना आरोपी, आमदाराच्या भावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. इतकं गंभीर प्रकरण असतानाही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर उत्तर प्रदेशासह देशभर संताप व्यक्त होत आहे.
हे प्रकरण ताजं असतानाच कठुआची घटना समोर आली असून या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. १० जानेवारी २०१८ ला बकऱ्या चारण्यासाठी गेलेली ८ वर्षांची चिमुरडी घरी न परतल्यानं वडील १२ जानेवारीला पोलिसांत तक्रार नोंदवतात. १७ जानेवारीला जंगलात चिमुरडीचा मृतदेह आढळतो नि त्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारं धक्कादायक वास्तव समोर येतं.
चिमुरडीवर सामुहीक बलात्कार होतो तोही मंदिरात. मंदिराच्या प्रमुखाकडून, त्याच्या मुलाकडून आणि पुतण्याकडून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सलग ७ दिवस बलात्कार करण्यात येतो. इतक कमी की काय तर मेरठवरून मित्राला बोलावलं जातं आणि तोही तिच्यावर बलात्कार करतो. हे प्रकरण दाबवण्यासाठी ४ पोलिसांना मॅनेज केलं जातं. त्यातील २ पोलिससुद्धा चिमुरडीवर बलात्कार करतात.
या दोन्ही घटना एका मागोमाग समोर आल्या असून या दोन्ही घटनांनी देश हदरला आहे. बलात्कारासारखा गंभीर गुन्हा असताना आरोपींना पाठिशी घातलं जातं, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो. यामुळे तर संपूर्ण देशवासीयांमध्ये संतापाची लाट आली आहे. सोशल मीडियावर पीडितांच्या न्यायासाठी, बलात्काऱ्यांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोहीम चालवण्यात येत आहे. गुरूवारी रात्री १२ वाजता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत कँडल मार्च काढला असून देशभर या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे.
असंच आंदोलन मुंबईतील आझाद मैदानासह अन्य काही ठिकाणी शुक्रवारी दुपारी करण्यात आलं. आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या आणि या महिलांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. तर बलात्काऱ्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी उचलून धरली. ''जोपर्यंत आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार, गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला घेराव घालणार'', अशी माहिती यावेळी सद्भावना संघाच्या वर्षा विद्या विलास यांनी दिली.
हेही वाचा-
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर बलात्कार, गुजरातच्या व्यावसायिकाला अटक
बहिणचं निघाली वैरिण, अश्लिल क्लिप काढून देहविक्रीत ढकललं