सीएसटी - घरकामगारांवर अन्याय केला जात असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात आला. घर कामगार समन्वय समितीकडून हा मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील घर कामगारांसाठी राज्य सरकारने 2004 साली कल्याणकारी मंडळाची स्थापना केली होती. या मंडळामार्फत घर कामागारांसाठी वयाची 55 वर्षे पूर्ण झाल्यानतंर सन्मानधन म्हणून रुपये 10 हजार देण्यात येतात. या शिवाय जनश्री विमा योजनेंतर्गत मिळणाऱ्या अपंगत्व, शिक्षण, मृत्यू इत्यादी लाभांसाठी त्यांना पात्र घोषित करण्यात आले. परंतु कामगार अधिकारी अथवा सहाय्यक आयुक्त कामगार यांच्याकडून त्याचा नियमित पाठपुरावा केला जात नसल्याने कामगारांना त्याचा लाभ मिळत नाही असे घर कामगार समन्वय समितीच्या सरचिटणीस शुभा शमीम यांनी सागितले.
घरकामगारांना प्रतितास किमान वेतन, आठवड्याची सुट्टी, सणांचा बोनस, वार्षिक आणि आजारपणाची पगारी रजा, कामगार कायदा मंजूर करा, तसंच किमान वेतन ठरवण्यासाठी समिती नेमण्याची प्रक्रिया त्वरित करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. घरकामगारांना अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्यक्रमाचे रेशनकार्ड देऊन त्यांना स्वस्त दराने धान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा या करायला हवा. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर पुन्हा संपावर जाऊ असे शुभा शमीम यांनी सागितले.