सध्या देशातील आणि राज्यातील राजकीय स्थिती पाहता हे 'मनु'चे राज्य आहे, असे वाटते अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांनी दिली. सानेगुरुजींच्या 76 व्या स्मृतीदिनानिमित्त साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रसेवा दल मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शनिवारी साने गुरुजी विद्यालय केटरिंग कॉलेजसमोर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांनी 'आव्हान मतभेदांचे की मनभेदांचे' या विषयावर देखील भाष्य केले.
हल्ली सुसंस्कृत असल्याचे भासवणे ही फॅशन झाली आहे. आज समाजात होत असलेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये समई लावून पसायदान म्हणण्याची पद्धत आहे. परंतु अनेकांना याचा अर्थ देखील माहीत नसतो. दिखाऊपणे वागण्याचे लोकांचे प्रमाण वाढल्याचेही त्या यावेळी म्हणाल्यात. जागतिकीकरणाच्या या काळात ज्यांनी मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या संघटना उभ्या केल्या, जे सातत्याने लढत राहिले, त्यांना आज देशात गुन्हेगार समजले जाते, ही शोकांतिक असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. आज न्यायालयात न्यायाधीशांच्या जागेवर मनु बसलेला आहे. हे विचार अत्यंत वाईट आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन अजून मिटलेले नाही. आज आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. ही सर्व आव्हाने पेलण्याची ताकद आपल्यात यायला हवी. शेतकरी संघर्ष देशात चिघळला गेला. सहारणपूरमधील घटना मन हेलावणारी आहे. आजही प्रगतशील भारतात अशा घटना घडतात, परिस्थिती हाताबाहेर जाते, ही बाब लज्जास्पद असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
विशेष म्हणजे, सध्या राजकीय परिस्थिती देखील हाताबाहेर गेलेली पहायला मिळते. महात्मा फुले यांच्या पुण्यातल्या वाड्यात यंदा वटपौर्णिमा साजरी केली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले गेले, ही बाब देखील अस्वस्थ करणारी असल्याचे, त्या यावेळी म्हणाल्या.