नालासोपारा येथील संतोष भुवन परिसरातून वाहुन गेलेल्या ६ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर येत आहे. अबु बकर असं या चिमुकल्याचं नाव असून, ओस्तवाल नगर इथं त्याचा मृतदेह सापडला आहे. अबु हा उघड्या गटारात पडून वाहून गेला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केलं होतं.
मुसळधार पावसामुळं बुधवारी मुंबईसह अनेक परिसरातील सखल भागात प्रचंड पाणी साचलं होतं. त्यामुळं या पाण्यातून वाट काढताना पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, साचलेलं पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेकदा गटारं उघडी ठेवली जातात. परंतु, अबु ज्या गटारातून वाहून गेला त्या गटाराचं झाकण निघालेलं होतं. हे त्याच्या लक्षात न आल्यानं चालता असताना तो पाण्याच्या दाबानं गटारामध्ये पडल्याचं समजतं.
या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं शोधकार्य सुरू केलं. मात्र अबु बकरचा शोध लागत नव्हता. मात्र, काही तास उलटल्यानंतर ओस्तवाल नगर इथं त्याचा मृतदेह सापडला. याप्रकरणी, आपल्या मुलाचा बळी हा महानगरपालिकेच्या बेजबदार कारभारामुळं गेल्याचा आरोप अबु बकरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा -
मुसळधार पावसामुळं मुंबईकरांच्या जीवाचे हाल
मुंबईत ४ दिवसात महिनाभराचा पाऊस, ४८८.७ मिमी पावसाची नोंद