Advertisement

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ‘प्रकाशगड’ची अतिरिक्त कुमक कामाला

तौंते चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व राज्यातील इतर जिल्ह्यातील वीजयंत्रणेचं मोठं नुकसान झालं.

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ‘प्रकाशगड’ची अतिरिक्त कुमक कामाला
SHARES

तौंते चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व राज्यातील इतर जिल्ह्यातील वीजयंत्रणेचं मोठं नुकसान झालं. खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर सुरळीत केला. 

सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रकाशगड मुख्यालयातून अतिरिक्त मनुष्यबळ पाठविण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली. 

मुंबई (mumbai) परिसराला वीजपुरवठा करणारी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव ही वाहिनी (दि.१८) बंद पडली होती. उपकेंद्रातील सुरक्षा प्रणालीनुसार हा बिघाड कळवा उपकेंद्रापासून ३८ किलोमीटर अंतरावर माथेरान येथील डोंगरादरम्यान होता. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री युध्दपातळीवर कामाचं नियोजन करून सकाळी वीजवाहिनी सुरू केली. 

४०० के. व्ही. कळवा-पडघे या वाहिनीची अर्थवायर विद्युत तारावर पडून विद्युत वाहिनी बंद पडली. बिघाडाचे ठिकाण तळोजा रेल्वेक्रॉसिंगजवळ होतं. तसंच चक्रीवादळामुळे झाडे पडल्याने रस्ते बंद होते. दरम्यान, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाशी तात्काळ संपर्क साधून भरपावसात अर्थ वायरचा अडथळा दूर केला. त्यामुळे ४०० के. व्ही. कळवा-पडघे ही वाहिनी पूर्ववत करण्यात आली. 

२२० के. व्ही. टेमघर या उपकेंद्रात अतिवृष्टी व वादळामुळे रात्री २ वाजता विद्युत उपकरणे नादुरूस्त झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करून रात्री ३.३० वाजता टेमघर वाहिनी व उपकेंद्राचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला.

हेही वाचा- Cyclone Tauktae: तौंते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘इतकं’ नुकसान

हवेच्या तीव्र जोरामुळे २२० के. व्ही. बॉम्बे डाईंग-सहारा वाहिनीच्या मनोऱ्याच्या वरच्या टोकाला असलेली अर्थ वायर वाहिनीवर पडली. या दोन मनोऱ्यादरम्यान मोठी नदी होती. या परिस्थितीतही मुसळधार पाऊस असताना महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रात्रीच दुरूस्ती करून वाहिनी पूर्ववत केली.

१०० के. व्ही. तळोजा येथून दोन वाहिन्या लिंडे ऑक्सिजन कारखान्यास वीजपुरवठा करतात. या दोन्ही वाहिन्या एकाचवेळी बंद पडून ऑक्सिजन कारखान्याचा वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर अवघ्या ४५ मिनिटांत विद्युत पुरवठा पूर्ववत केला. 

पडघे, कळवा, कलरकेम, बोईसर, आपटा, उरण, कुडूस, डोंबिवली, वसई, ट्रॉम्बे, बोरिवली, नागोठाणे व इतर उपकेंद्रातील संबंधित अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत कठीण परिस्थितीतही ऑक्सिजन कारखाने, कोविड केंद्रे यांचा विद्युत पुरवठा अखंडित ठेवला. 

विशेष पथक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ उपकेंद्रे तसंच १०० पेक्षा जास्त फिडर बंद पडल्याने पूर्ण जिल्ह्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे. या कामासाठी २१ ठेकेदार संस्थांचे सुमारे २५० प्रशिक्षित कामगार, याशिवाय कल्याण, कोल्हापूर, भांडुप, बारामती, सांगली येथील नियमित ४६८ जनमित्र आणि ८७ अभियंत्यांची टीम १९ मे रोजी हजर झाली असून ते विविध ठिकाणी स्थानिक २३४ जनमित्रांसोबत कार्यरत झाले आहेत. ३१ पैकी ३१ उपकेंद्रे पुन्हा सुरू झाली असून ७८ फिडर सुरू करण्यात यश आलं आहे. याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा