Advertisement

cyclone tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम

मुंबईत सोमवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, मुंबईसाठी मे महिन्यातील हा विक्रमी पावसाचा दिवस ठरला.

cyclone tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम
SHARES

तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईला चांगलंच झोडपून काढलं. या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नसला तरी मुंबईत सोमवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, मुंबईसाठी मे महिन्यातील हा विक्रमी पावसाचा दिवस ठरला. मुंबईत सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली.

या चक्रीवादळाचा परिणाम रविवारी संध्याकाळपासूनच मुंबईवर दिसू लागला होता. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रविवार रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. मात्र, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मे महिन्यातील सर्वाधिक पावसाचा विक्रम सोमवारी झाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिलिमिटर पावसाची नोंद हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रानं केली. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत पाऊस कोसळत होता.

यापूर्वी आतापर्यंतच्या मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही १९ मे २००० रोजी करण्यात आली होती. त्या दिवशी सरासरी १९०.८ मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौक्तेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला. कुलाबा केंद्राने सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १८९.२ मिमी पाऊस नोंदवला. मध्य आणि दक्षिण मुंबईतील अनेक भागांत २०० मिमीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली.

मुंबईत सरासरी १०८ किमी ताशी या वेगाने वारे वाहात होते. कुलाबा येथील अफगाण चर्च परिसरात दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वाऱ्याचा वेग १११ किमी ताशी असा नोंदवला गेला. त्यानंतरही वादळाची तीव्रता वाढतच गेली आणि दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कुलाबा येथे ताशी ११४ किमी वेगाची नोंद झाली. गेल्यावर्षी निसर्ग वादळ अलिबागमध्ये धडकलेले असताना तेथील वाऱ्यांचा वेग हा सरासरी १२० किमी ताशी नोंदला गेला होता. 

मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी भिंती कोसळल्या, तर अनेक ठिकाणी छताचे पत्रे उडाले. काही ठिकाणी वीजप्रवाहही खंडीत झाला होता. उपनगरीय रेल्वे वाहतूक, विमान वाहतुकीवरही वादळाचा परिणाम झाला. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर फांद्या पडल्यामुळे काही मार्गावरील वाहतूक बंद झाली. रस्त्यांवरही अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले होते.

सध्या मुंबईत जमावबंदी आहे. बहुतांशी कार्यालयांतील कर्मचारी घरातून काम करत आहेत. त्यामुळे मुळातच वर्दळ कमी झाली आहे. रस्त्यांवर तुरळक गाडय़ा सोमवारी होत्या. रेल्वेसाठीही गर्दी कमी होती. वर्दळ घटल्यामुळे वादळाचा तडाखा मोठा असला तरी फार हानी झाली नाही. वादळातील पडझडीच्या घटनांमध्ये सहा नागरिक किरकोळ जखमी झाले. त्याचप्रमाणे एक नौका बुडली मात्र त्यावरील एकूण चार खलाशांचा जीव वाचवण्यात आला तर एक खलाशाचा शोध सोमवारी उशीरापर्यंत लागू शकला नाही.



हेही वाचा - 

Cyclone Tauktae : मुंबई, ठाण्यात पुन्हा हायअलर्ट, IMDचा अतिमुसळधार पावासाचा इशारा

Cyclone Tauktae: महाराष्ट्राला ‘तौंते’चा फटका; पंतप्रधानांचा उद्धव ठाकरेंना फोन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा