देशभरात रस्ते अपघातांची संख्या वाढत असतानाच यंदा मुंबईच्या अपघातात मात्र घट झाल्याचं आढळून आलं आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अपघातात २० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. तर सर्वाधिक अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचं प्रकरशाने दिसून आलं आहे. "ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपिक इनिशिएटिव्ह फाॅर ग्लोबल रोड सेफ्टी" या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे.
रस्ते सुरक्षेबाबात राज्य सरकारने २०१५ मध्ये ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपिक या कंपनीसोबत पाच वर्षांना करार केला. त्यानुसार रस्ते अपघात रोखण्यासाठी शहरात काय उपयायोजना करायला हव्यात, याबाबतचा अहवाल तयार करत ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपिक ही कंपनी अहवाल तयार करून तो राज्य सरकार, पालिका आणि वाहतूक पोलिसांना देत आहे.
२०१५ मध्ये मुंबईत रस्ते अपघातात ६११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान २०१७ मध्ये मृत्यूचं प्रमाण ४९० वर पोहचलं होतं. या अपघातांमध्ये चारचाकी वाहनाने झालेल्या अपघातांचं प्रमाण ५२ टक्क्यांवर आहे. तर दुचाकीच्या अपघातांचं प्रमाण ३८ टक्के इतकं आहे.
रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये २० ते ३५ वयोमर्यादा असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर महिला चालकांमध्ये पन्नाशीनंतर वाहने चालवणाऱ्या महिला चालकांची संख्या लक्षणीय आहे.
हे अपघात रोखण्यासाठी आता ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपिकतर्फे शहरातील रस्त्यांचं १ महिन्यात सर्वेक्षण करून अपघात रोखण्यासाठी उपयुक्त गोष्टींची माहिती राज्यसरकार, पोलिस आणि पालिकेला दिली जाणार आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज, रेडिओ आणि न्यूज चेनेलच्या माध्यमातून नागरिकांना रस्ते सुरक्षा आणि नियमांविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.