नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केट ९ दिवसानंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. नव्यानं मार्केट सुरू झाल्यानंतर सोमवारी ७६५ टन फळांची आवक झाली आहे. कांदा, बटाटा, भाजीपाला व धान्य मार्केट सुरळीत सुरू झाल्यामुळं मुंबईसह नवी मुंबईकरांची गैरसोय दूर होऊ लागली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणात येत नसल्यानं बाजार समितीमधील फळ मार्केट ११ एप्रिलपासून बंद करण्यात आलं होतं. सोमवारी १९४ वाहनांमधून ७६५ टन फळांची आवक झाली. यामध्ये आंबा, अननस, द्राक्षे, कलिंगड व इतर फळांचा समावेश आहे. मार्केट मधील गर्दी कमी करण्यासाठी टरबूज, खरबूज व्यापाऱ्यांना एस.टी स्थानकाच्या भूखंडावर जागा देण्यात आली आहे.
एपीएमसीच्या ५ मार्केटमध्ये सोमवारी ६५१ ट्रक व टेंपोतून ५५७९ टन कृषीमालाची आवक आला. यामध्ये ७९२ टन कांदा बटाटा, १२०० टन भाजीपाला, मसाला मार्केट मध्ये ९४२ व धान्य मार्केटमध्ये १८६९ टन कृषी माल विक्रीसाठी आला.