मलबार हिल टेकडीला संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामासाठी पालिका अडीच कोटी रुपये खर्च करणार आहे. पावसाळ्यात मलबार हिल टेकडीच्या उतारावरून माती आणि दगड आदींची मोठ्याप्रमाणात घसरण झाल्यामुळे बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या लाद्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत.
तसेच या जागेखालून पाणी पुरवठा करणाऱ्या ११ जलवाहिन्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मलबार टेकडी येथील पुरातन बाबुलनाथ मंदिर तसेच करवा चौथ पॉईंट याठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. याठिकाणी टेकडीच्या उतारावरून पावसाळ्यात माती व दगडाची घसरण होते. त्यामुळे काही ठिकाणी तडे गेले आहेत.
तर काही ठिकाणी भिंतही पडल्याच्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाबुलनाथ मंदिर ते करवा चौथ येथील काही भागाची टप्प्यासहित संरक्षक भिंत बांधून पायऱ्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
खचलेल्या टेकडीच्या जागेखालून ३०० मी.मी. ते १२०० मी.मी व्यासाच्या मोठमोठ्या ११ जलवाहिन्या जात आहेत. त्यामुळे भविष्यात जर टेकडीचा भाग खचून कोणत्याही प्रकारची दुघर्टना घडल्यास तर या जलवाहिन्या फुटू शकतात.
परिणामी यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊ होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा