पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणं, आता हे काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. यामुळे मुंबईकर त्रस्त होतात. पालिकेच्या नावानं आपण बोंबा ठोकतो. पण यात फक्त पालिकेचीच चुक आहे का? मुंबईची तुंबई होण्याची नेमकी काय कारणं आहेत? मुंबई का पाणी साचतं? याचीच उत्तरं तुम्हाला आज आम्ही देणार आहोत. मुंबईत पाणी भरण्याची ही ६ कारणं तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतील.
मुंबई हे ७ बेटं एकमेकांना जोडून तयार झालेलं शहर आहे, हे आपण शाळेत असताना वाचलंच असेल. या सात बेटांवर २२ टेकड्यांची रांग आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून ठाण्याच्या दिशेनं ट्रेन पकडलीत की डाव्या बाजूला घाटकोपर ते भांडुप दरम्यान तुम्हाला या टेकड्या दिसतील. पण मुंबईतल्या काही सखल भागात लोकवस्ती वाढत जात असताना तिथं भराव घालण्यात आला. त्याआधी तो भाग दलदल आणि खाडीचा होता. भराव टाकल्यानं या भागांमध्ये पाणी साचतं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर सायन ते कुर्ला यामध्ये रेल्वे रूळ टाकण्यासाठी भराव टाकण्यात आला होता. त्यानंतर बीकेसी तर पूर्ण खाडीवर भराव टाकून उभे करण्यात आले आहे.
मुंबईला अथांग समुद्रकिनारा लाभला आहे. नद्या, नाल्यांमधून वाहणारं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. पण समुद्राला भरती आली की पाणी येऊ लागतं. म्हणजे शहरातून बाहेर जाणारं पाणीही पुन्हा शहरात घुसतं. पण ही परिस्थिती बदलता आली असती जर खारफुटी जंगलं आज जिवंत असती. खारफुटीमध्ये भरतीचं पाणी शहरात येण्यापासून रोखण्याची क्षमता असते. एकप्रकारे निसर्गानं आपल्याला एक अनमोल देणगीच दिली होती. पण मानवानं त्याची कदर केली नाही. मानवानं ५०% पेक्षा अधिक खारफुटीची जंगलं तोडून नष्ट केली आहेत. याचाच परिणाम समुद्रातून बाहेर येणारं पाणी अडवलं जात नाही.
मुंबईत लोकसंख्या वाढत गेली. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या बोजामुळे नद्या, नाले आणि समुद्रात भर टाकण्यात आली. त्यामुळे राहण्याची व्यवस्था झाली. पण पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था कोलमडली. याचा आणखी एक परिणाम म्हणजे मुंबई वाढत गेली पण त्यामानानं गटारं आणि नाले यांची संख्या कमी झाली. त्यामुळे उपलब्ध गटारांवर आणि नाल्यांवरील बोजा वाढला.
लोकांची रस्त्यावर, नाले, गटारांमध्ये कचरा टाकण्याची सवय हे देखील पाणी तुंबण्यास कारणीभूत असल्याचं समोर येत आहे. पालिका कचरा साफ करो वा ना करो पण लोकांनी आपली जबाबदारी समजून घेणं गरजेचं आहे. कचरा रस्त्यावर, रेल्वे रुळांवर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी टाकल्यानं तो नाल्याच्या, गटाराच्या तोंडावर अडकतो. परिणामी पाण्याचा निचरा होण्यास अडचण येते.
मुंबईच्या डोंगराळ भागात अधिक प्रमाणात पाऊस पडतो. यामुळे डोंगरावरचं पाणी उताराच्या दिशेनं वाहत शहरात येऊन थांबतं.
मुंबईच्या सखल भागात साचणारे पाणी उपसून बाहेर फेकण्यासाठी पालिका पंपिंग स्टेशन उभारते. पण या पंपिंग स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्यासोबत दगड आणि कचरा अडकतो. परिणामी पंपिंग स्टेशनच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.
हेही वाचा