डोंगरी भागात इमारत कोसळल्याची घटना दुर्दैवी घटना घडली आहे. यापूर्वी देखील मुंबईत इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. धोकादायक इमारतींवर प्रशासना मार्फत कुठलीच कारवाई न होणे, इमारत धोकादायक असूनही नागरिकांनी तिथेच राहणं अशा कारणांमुळे या घटना होतात आणि अनेक जण मृत्यूमुखी पडतात. खास करून जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांना अधिक धोका असतो. अशी घटना तुमच्यासोबत घडू नये म्हणून प्रत्येकानं काळजी घेण गरजेचं आहे.
आपले राहते घर, इमारत बोलू शकत नाही. पण त्याची वेगवेगळी लक्षणं असतात. यावर आवर आपली नजर असणं आवश्यकच आहे. योग्यवेळी लक्षं दिलंत तर पुढचा धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याआधी धोका कसा ओळखाल याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
१) सोसायटीनं एक फाईल करून दर दहा महिन्यांनी काही नोंद आपल्या इमारतीसंबंधी करायल्या हव्यात. इमारत किती जुनी आहे, त्यानंतर शेवटचं स्ट्रक्चर ऑडिट कधी केलं होतं? त्या स्ट्रक्चर ऑडिटमधून काय समोर आलं होतं? हे सर्व मुद्दे त्या फाईलमध्ये नमुद हव्या आहेत.
२) इमारतीसोबतच सभोवतालच्या जमिनीलगतच्या भागाचे निरीक्षण करणं आवश्यक आहे. इमारतीच्या सभोवतालची जमीन तळमजल्याच्या फरशीपेक्षा उंचावर असेल तर पावसात घरात पाणी शुरू शकते. तळमजल्याची फरशी खचू शकते.
३) पावसाळ्यात इमारतीभोवती पावसाचे पाणी साचून राहणे, उंदीर-घुशीच्या उपद्रवामुळे इमारती सभोवतालची जमीन भुसभुशीत होणे, कमकुवत होणे, जमिनीखालच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून सभोवताली पाणी झिरपणे. यामुळे इमारतीच्या पायाखालच्या जमिनीचे वजन पेलण्याची क्षमता कमी होऊन इमारीचा भाग खचू शकतो.
४) तळमजल्याच्या भिंतींना पावसाळ्यात ओल धरणे, उन्हाळ्यात सुकल्यानं पोपडे धरणे यामुळे त्या भागातील प्लास्टर पडते. असावेळी वीट दिसू लागते. यामुळे बांधकाम हळू-हळू कमकुवत होऊ लागते.
५) इमारतीत बांधकाम वैगरे चालत असेल तर त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे. परवानगी देण्यात आली तरी इमारतीच्या पिलरला कुठलाही धक्का बसता कामा नये याची काळजी घ्यावी. जर इमारतीच्या पिलरला जर धक्का लागणं हे धोकादायक असू शकतं.
६) बाल्कनी, बाल्कनीचे कठडे, गच्चीचे कठडे, खिडक्यांचे छज्जे-झुकणे याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळे तो भाग पडून नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता असू शकते.
७) बाहेरील भिंतीतील कॉलम, छज्जे, बीम यांना भेगा पडणे, प्लास्टर गळून पडणे, तडे जाणे, गंजलेल्या सळ्या दिसणे ही सर्व लक्षणं इमारतीचा आरसीसाचा सांगाडा कमकुवत होण्याची सुरुवात आहे असे दर्शवते.
८) प्लास्टरवर शेवाळे येणे, ड्रेनेज पाईपच्या सांध्यावर झाडे उगवणं, गवत वाढणं, ड्रेनेज-प्लिबग लाइन गंजणे किंवा फुटणे या समस्या दिसायला लागल्या की समजून जा की घरात होणाऱ्या लिकेजकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आहेत. यासाठी ड्रेनेज पाईपची गळती दुरुस्त करून घ्यावी.
९) इमारतीला १०-१५ वर्ष झाली की त्याचं ऑडिट होणं आवश्यकच आहे. यामुळे इमारतीची नेमकी काय अवस्था आहे हे कळून येतं.
१०) वरील लक्षणं आढळल्यास ऑडिट करून घ्यावं. ऑडिटमध्ये धोकादायक किंवा अतिधोकादायक यादीत नाव असेल तर इमारत खाली करावी. असा परिस्थितीत तात्काळ दुसऱ्या घराची व्यवस्था करणं थोडं कठिण असतं. पण जीव वाचवण्यासाठी इमारत खाली करणं आवश्यक आहे.
हेही वाचा