केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात मंगळवारी देशभरात शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातही कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. अनेक बाजारपेठा आणि व्यवसाय, वाहतूक ठप्प असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. परिणामी, भारत बंदचा फटका आता भाज्यांना बसला आहे. यामुळं बुधवारी अनेक मोठ्या मार्केटमध्ये भाज्यांचे भाव कडाडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत बंदमुळं भाज्यांचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळं भाज्या विकत घेत असताना आता नागरिकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले होते. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. एपीएमसी मधील ५ ही बाजारपेठा पूर्ण बंद ठेवण्यात आल्या होत्या.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कणकवलीत भाजपकडून अल्प दरात कांदे विक्री करण्यात आली. यामुळं ग्राहकांची कांदे खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. सिंधुदुर्गात सध्या कांद्याचे दर ४५ रुपये किलो असताना भाजपकडून ३० रुपये दरानं विक्री करण्यात आली. खासदार नारायण राणे यांच्या सहकार्यानं ही विक्री केल्याची माहिती समोर आली होती.
भाज्यांचे दर
भाजी | आधी | आता |
टोमॅटो | ३० | ४० |
फरस्बी | ५० | ८० |
काकडी | २० | ४० |
दुधी | ८ | २० |
वांगी | १३ | ३० |
हिरवा वाटाणा | ४० | ६० |
गवार | ३० | ४० |
कारली | १६ | २४ |