तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नसल्याने महापालिकेने मुंबईत दहा टक्के पाणीकपात जाहीर केली होती. पण पावसाळ्यात पाऊस होऊनही पाणीकपात कायम आहे.
पाऊस कमी असल्याने तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे जूनच्या अखेरीस दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय पालिकेला घ्यावा लागला.
कपातीमुळे दररोज ५०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत असली, तरी अनेक भागात पाण्याला दाब नाही, पुरेसे पाणी मिळत नाही, पाणीपुरवठ्याची वेळ कमी होणे यासह अनेक प्रकारच्या तक्रारी नागरिकांकडून पालिका आणि संबंधित भागातील माजी नगरसेवकांकडे करण्यात आल्या आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये मिळून सोमवारी, १७ जुलै रोजी पाणीसाठा जेमतेम ३४.९ टक्क्यांपर्यंत, म्हणजे ४ लाख ९३ हजार ३३४ दशलक्ष लिटरवर पोहोचला होता. गेल्या वर्षी याच दिवशी साठा ८२.९ टक्के म्हणजे ११ लाख ८८ हजार १४३ दशलक्ष लिटर इतका होता.
दरम्यान, काही विभागांमध्ये 10 टक्क्याहून अधिक टक्के पाणीकपात केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.