मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास रस्त्यावर पाणी साचतं. अनेक सखल भागात पाणी साचल्यानं चाकरमान्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अशाच काहीस अनुभव घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगर परिसरातील नागरिकांना आला आहे. कामराज नगर परिसरात जाण्यासाठी महत्त्वाचा असणारा भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्यातून वाट काढावी लागत आहे.
महापालिकेने भुयारी मार्गांत साचलेले पाणी उपसण्यासाठी पंप बसवला असला तरी दिवसातून एकदाच हा पंप सुरू केला जातो. मात्र, त्यानंतर पुन्हा पाणी साचत असल्याची तक्रार येथील नागरिक करत आहेत. या परिसरात एक लाखांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या ठिकाणच्या नागरिकांना रेल्वे स्थानक अथवा बाजारपेठ परिसरात ये-जा करण्यासाठी कामराज नगर भुयारी मार्ग वापरावा लागतो. मात्र, हा भुयारी मार्ग सखल भागात असल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते.
प्रशासनातर्फे दरवर्षी पावसाळ्यात पंप बसविला जातो. मात्र, पंप दिवसातून एकदाच दुपारी १२ वाजता सुरू केला जातो. त्यामुळे इतर वेळेत पाऊस आल्यास पुन्हा पाणी साचते. दरम्यान सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्याशिवाय, लॉकडाऊन आणि कोरोनाच्या धास्तीमूळ अनेक कामगार वर्गही उपस्थित नसल्यानं अशा प्रकारच्या घटनांचा सामना करावा लागत आहे.