वेस्ट इंडिजविरुद्ध भारत यांच्यातील दुसरी टेस्ट शुक्रवारपासून हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या टेस्टसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून निवड समितीने संघात कोणताही बदल केलेला नाही. असं असलं तरी शुक्रवारी अंतिम ११ खेळांडूंमध्ये शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी शार्दूल ठाकूरला १२ जणांमध्ये स्थान देण्यात आलं होतं. मात्र अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याला संधी मिळू शकली नव्हती. शार्दुलच्या ऐवजी संघात उमेश यादव आणि मोहम्मद शमी या जोडीला घेण्यात आलं होतं.
परंतु उमेशची कामगिरी या सामन्यात समाधानकारक न राहिल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात उमेश यादवला १४ षटकांत फक्त १ विकेट घेता आली होती. तर, मोहम्मद शमीने १२ षटकांत २ विकेट घेतल्या होत्या.
Team India for the 2nd Test against Windies at Hyderabad 🇮🇳 #INDvWI pic.twitter.com/QMgNm6jf4Q
— BCCI (@BCCI) October 11, 2018
या मालिकेतील दुसऱ्या टेस्टसाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देऊन मयंक अगरवाल या खेळाडूलाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मयंक अगरवालला १२ जणांच्या संघात स्थान मिळवता आलं नाही.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. हा सामना केवळ ३ दिवसांत संपला होता. भारताने पहिल्या डावात ६४९ धावा केल्या होत्या. मात्र, वेस्ट इंडिज संघाला दोन्ही डावात मिळूनही तितकी धावसंख्या उभारता आली नव्हती. त्यामुळे या मालिकेत भारत १-० आघाडीवर आहे.
– लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर
हेही वाचा-
'हा' आहे टीम इंडियाचा नवा 'टीममेट'!, नक्की बघा...
वेस्ट इंडिजविरूद्धची मुंबई वन डे संकटात!