नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेटनी विजय मिळवला आहे. या कसोटी सामन्याचा निकाल दुसऱ्या दिवशीच लागला. या विजयासह चार सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. या पराभवासह इंग्लंडचा संघ आयसीसी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर भारतीय संघाने चौथी कसोटी ड्रॉ जरी केली तरी ते फायनलमध्ये पोहोचू शकतील.
भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्येही इंग्लंडचा डाव अवघ्या ८१ धावांवर आटोपला. अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंड संघानं लोटांगण घातलं.
दुसऱ्या इनिंगमध्ये अक्षर पटेलने १५ ओव्हरमध्ये ३१ रन देत ५ विकेट घेतल्या आहेत. तर आर अश्विन याने १५ ओव्हरमध्ये ४८ रन देत ४ विकेट घेतल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरला १ विकेट मिळाली. इंग्लंडच्या संघाकडून जो रुटने १९ रन, बेन स्टोक्सने २५ रन तर ओली पोपने १२ रन केले. इंग्लंडच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आलं नाही.
पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या संघाने ११२ घावा केल्या होत्या. अक्षर पटेलने ६ विकेट, अश्विनने ३ विकेट तर इशांत शर्माला एक विकेट मिळाली होती. टीम इंडियाचा पहिला डाव १४५ धावांवर आटोपला होता. टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये फक्त ३३ रनची आघाडी मिळाली होती.
दुसऱ्या डावांत तिसरा बळी घेत अश्विन यानं कसोटी क्रिकेटमध्ये ४०० व्या बळींची नोंद केली आहे. अश्विन यानं २१ हजार २४२ चेंडूमध्ये ४०० बळी घेतले आहेत. ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा एकूण १७ वा आणि भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी कपील देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या भारतीय गोलंदाजांनी हा विक्रम केला आहे.