सततच्या हाराकिरीने बेजार झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मंगळवारच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा १४ रन्सने पराभव करत आयपीएलच्या प्ले ऑफ लढतीसाठीचं आव्हान जीवंत ठेवलं. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा पराभवाची चव चाखत प्ले ऑफची वाट खडतर केली.
मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमधली ही दुसरी लढत होती. दोन्ही संघाने ७ पैकी २ मॅच जिंकलेल्या असल्याने प्ले ऑफच्या आशा जीवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघामध्ये चुरस लागली होती. मुंबईने टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली.
मनन व्होराच्या (३१ बॉलमध्ये ४१ रन्स) उत्तम ओपनिंगच्या जोरावर आरसीबीला चांगला स्टार्ट मिळाला. ९ व्या ओव्हरमध्ये मयांक मार्कंडेयने मननची विकेट काढल्यावर काही वेळ आरसीबीच्या धावगतीला ब्रेक लागला. मग डावाची सूत्रं हाती घेतली ती कर्णधार विराट कोहली आणि ब्रेंडेन मॅक्यूलॅम यांनी. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६० रन्सची पार्टनरशीप केली. ही जोडी घातक ठरत असताना हार्दिक पंड्याने मॅक्यूलॅमला आऊट केलं.
हार्दिकने मंदीप सिंग आणि विराटला १८ व्या ओव्हरमध्ये लागोपाठ आऊट करत आरसीबीला धक्का दिला. तरीही कोलिन ग्रॅण्डएमच्या १० बॉलमध्ये २३ रन्सच्या जोरावर शेवटच्या ३ ओव्हरमध्ये आरसीबीने रन्स जमवत १६७ रन्सचा पल्ला गाठला.
१६८ रन्स बनवण्याचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवातच डळमळीत झाली. पहिल्या ओव्हरमध्ये ईशान किशन आणि चौथ्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव असे मुंबईचे दोन्ही ओपनर डगआऊटमध्ये परतले. खराब फॉर्मात असलेला मुंबईचा कर्णधार रोहीत शर्माही आल्या पावली माघारी परतला.
शेवटी टार्गेट पूर्ण करण्याची जबाबदारी पंड्या बंधूनी आपल्या खांद्यावर घेतली. हार्दिक आणि कृणालने ५६ रन्सची पार्टनरशीप रचली. पण शेवटच्या २ ओव्हरमध्ये ३० हून जास्त रन्स करायचे असताना आधी कृणाल आणि नंतर ५० रन्स करून हार्दिक आऊट झाल्याने मुंबईच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.