इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाराव्या हंगामातील सुरवातीचे तीन सामने जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मुंबई इंडियन्सनं पराभव केला आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात मुंबईनं ३७ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं १७१ धावांचं आव्हान चेन्नई समोर ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला १३३ धावा करता आल्या. दरम्यान, मुंबईचा हा दुसरा विजय, असून, चेन्नईचा पहिला पराभव आहे. त्याशिवाय मुंबईचा हा आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून सुर्यकुमार यादवनं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर कृणाल पंड्या, हार्दिक पंड्यानं आणि पोलार्ड यांनी दमदार फलंदाजी करत १७१ धावांचं आव्हान चेन्नई समोर ठेवलं. सूर्यकुमार यादवनं ४३ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकार मारत ५९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर अखेरच्या दोन षटकांमध्ये हार्दिक पंड्या आणि पोलार्ड यांनी ४५ धावा केल्या. हार्दिकनं ८ चेंडूंत नाबाद २५ आणि पोलार्डने ७ चेंडूंमध्ये नाबाद नाबाद १७ धावा केल्या.
चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी जलद गोलंदाज शार्दुल ठाकूरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी १-१ बळी घेतला. तसंच, मुंबईकडून गोलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकांनीही चांगली कामगिरी बजावली. पोलार्ड आणि यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉक यांनी सामन्यात काही चांगले झेल पकडले. मुंबईच्या गोलंदाजीवेळी जलद गोलंदाज लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्यानं ३-३ बळी घेतले. त्याशिवाय बेहरनडॉर्फनं २ बळी घेतले असून, हा त्याचा पहिलाच सामना होता.
मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडिअमवर चेन्नई सुपर किंग्जला ३७ धावांनी पराभूत केलं असून, मुंबईचा हा आतापर्यंतच्या आयपीएलमधील शंभरावा विजय ठरला आहे. याआधी मुंबईनं १७४ सामन्यांमध्ये ९९ विजय मिळवले होते. मात्र, हा सामना जिंकून मुंबईनं विजयाचे शतक पूर्ण केले आहे.