मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील पहिल्या सामन्यात मुंबईनं ३७ धावांनी चेन्नईचा पराभव केला होता. त्याचप्रमाणं दुसऱ्या सामन्यातही मुंबईनं ४६ धावांनी चेन्नईचा पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मानं अर्धशतकी (६७) खेळी करत मुंबईला १५५ धावांपर्यंत पोहोचवलं. तसंच, चेन्नईपुढे १५६ धावांचे आव्हान ठेवलं. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याचप्रमाणं या सामन्यात मुंबईचा जलद गोलंदाज लसिथ मलिंगानं ४ विकेट्स घेतल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र क्विंटन डी-कॉक लवकर माघारी परतला. यानंतर एविन लुईसच्या साथीने रोहितने मुंबईचा डाव सावरला. रोहितने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६७ धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या एविन लुईसने ३२ धावा केल्या. परंतु, लुईस बाद झाल्यावर मधल्या फळीतील फलंदाजांनी फारशी चांगली फलंदाज केली नाही. त्यामुळं मुंबईला मोठी झेप घेता आली नाही.
मुंबईनं ठेवलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीर फलंदाज शेन वॉटसननं ३ चेंडूत २ चौकार लगावत तडाखेबाज सुरुवात केली होती. मात्र, मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. या सामन्यात कर्णधार धोनीच्या जागी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सुरेश रैना याच्यावर सोपवण्यात आली होती. परंतु, रैनाही २ धावा करून झेलबाद झाला. त्यानंतर अंबाती रायडू त्रिफळाचीत झाला. तसंच, केदार जाधव देखील ६ धावा करत माघारी परतला.
चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी गोलंदाजी करताना मिचेल सँटनर यानं २ विकेट्स घेतल्या. तसंच, इम्रान ताहीर आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. त्याचप्रमाणं, मुंबईकडून मलिंगानं ४ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय, कृणाल पंड्या आणि बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पंड्या आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.