Advertisement

मुंबईत खेळविण्यात येणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका


मुंबईत खेळविण्यात येणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची टीका
SHARES

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाचं वेळापत्रक बीसीसीआयनं रविवारी  जाहीर केलं. अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू आणि कोलकाता या ६ शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र, या वेळापत्रकावर काही फ्रँचायझी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्या होम ग्राऊंडमध्ये एकही सामना होणार नाही. त्यात पंजाब किंग्सचे CEO नेस वाडिया यांनी टीका केली होती. त्यात आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही बीसीसीआयला पत्र लिहिलं आहे.

मोहालीचा आयपीएल सामन्यांसाठी विचार केला जावा, अशी विनंती करणारे पत्र मेलद्वारे अमरिंदर सिंग यांनी बीसीसीआयला पाठवलं आहे. तसंच, त्यांनी मुंबईला यजमानपद दिल्यावरून टीका केली आहे. मुंबईत जवळपास ९००० कोरोना रुग्ण सापडत असतानाही बीसीसीआयनं त्यांना यजमानपद का दिलं, यावरूनही अमरिंदर सिंग यांनी टीका केली.

'मुंबईत दिवसाला ९००० कोरोना रुग्ण सापडत आहेत आणि अशा परिस्थितही तिथे आयपीएल सामने होऊ शकतात, मग मोहालीत का नाही?. आम्ही सर्व काळजी घेऊ', असं अमरिंदर सिंग यांनी पत्रात लिहिलं आहे.

शेतकरी आंदोलनामुळं मोहालीत आयपीएल सामन्यांचं आयोजन होऊ शकत नाही, हे बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलं होतं. शेतकरी आंदोलनामुळं आयपीएल सामन्यांत कोणताही व्यत्यय येऊ नये, असं बीसीसीआयला वाटतं. 'मोहालीत आयपीएलचे सामने होत असताना स्टेडियमबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन व्हाव, अशी परिस्थिती उद्भवू नये असे आम्हाला वाटते. त्यामुळे जगभरातील प्रसिद्धी माध्यमांचं लक्ष केंद्रीत होईल. मोहालीतील अशी परिस्थिती असल्यामुळे आयपीएल सामन्यांसाठी या शहराचा विचार केला गेला नाही,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा