एका बाजूला 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया' (सीसीआय)ने २९ आॅक्टोबरला भारत-वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या वन डे मॅचच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. तर दुसऱ्या बाजूला आमच्या हातातली मॅच काढून ती 'सीसीआय'ला का दिली? असा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ला विचारत 'मुंबई क्रिकेट असोसिएशन' (एमसीए)ने 'बीसीसीआय'विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
ही वन डे मॅच याआधी वानखेडे स्टेडियमवर होणार होती. मात्र 'एमसीए' ला आर्थिक अडचणींमुळे या मॅचचं आयोजन करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे बीसीसीआयने ही मॅच ब्रेबाॅर्न स्टेडियमवर हलवली.
'एमसीए'ने 'बीसीसीआय'ला एक पत्र देखील लिहिलं आहे. या पत्रामध्ये मॅच हलवण्यामागची कारणं विचारली आहेत. याआधी पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनसोबत 'बीसीसीआय'चे तिकीटांच्या वाटपावरून खटके उडाले आहेत. त्यामुळेच इंदोरला होणारी दुसरी वन डे मॅच तिकीट वाटपाच्या वादामुळे विशाखापट्टणमला हलवण्यात आली.
'सीसीआय'च्या मते, २९ आॅक्टोबरला होणाऱ्या मॅचसाठी अंदाजे २५ हजार तिकीटं उपलब्ध होणार आहेत. 'बीसीसीआय'ने 'सीसीआय'ला पाठवलेल्या पत्रानुसार तिकीटांच्या विक्रीसाठी एका खासगी एजन्सीसोबत चर्चा सुरू असल्याचंही कळत आहे.
ब्रेबाॅर्न स्टेडियमवर २००६ पासून अद्यापपर्यंत कुठलीही वन डे मॅच खेळवण्यात आलेली नाही. तर २००९ मध्ये भारत विरूद्ध श्रीलंका अशी टेस्ट मॅच या स्टेडियमवर खेळवण्यात आली हाेती. या स्टेडियमचा वापर प्रामुख्याने परदेशी संघाच्या प्रॅक्टीस मॅचसाठीच होतो.
हेही वाचा-
वेस्ट इंडिज सीरिज: चौथी 'वन डे' वानखेडेऐवजी ब्रेबाॅर्नवर!
टी-२० लीगमध्ये वाढता भ्रष्टाचार? 'आयसीसी' करणार कडक नियमावली