भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २९ आॅक्टोबरला होणारी चौथी वन डे मॅच मुंबईतील वानखेडे स्टेडियमऐवजी आता क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय)च्या ब्रेबाॅर्न स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ला भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे भारतीय नियामक मंडळा (बीसीसीआय)ने हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी करत 'बीसीसीआय'ने म्हटलं आहे की, ''सर्वोच्च न्यायालयाने नेमणूक केलेल्या प्रशासकीय समिती (सीओए) च्या सल्लानुसार भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान २९ आॅक्टोबर रोजी होणारी चौथी इंटरनॅशनल वन डे मॅच वानखेडे स्टेडियमवरून क्रिकेट क्लब आॅफ इंडिया, मुंबई इथं खेळवण्यात येणार आहे.''
याआधी या वन डे मॅचचं आयोजन 'एमसीए'च्या माध्यमातून वानखेडे स्टेडियमवर होणार होतं. परंतु 'एमसीए'ला काही तांत्रिक कारणांमुळे आपल्या बँक खात्यातून रक्कम काढण अशक्य झाल्याने या मॅचच्या आयोजनावर संकट ओढावलं. ही आर्थिक अडचण त्यांनी प्रशासकीय समितीपुढे मांडली. तसंच 'बीसीसीआय'ने या सामन्याचं आयोजन करावं, अशी विनंतीही 'एमसीए'ने केली. परंतु 'बीसीसीआय'ने त्याला नकार दिला.
मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयवर प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या न्या. व्ही. एम. कानडे आणि हेमंत गोखले यांचा कार्यकाळ १५ सप्टेंबर रोजी संपला. हा कार्यकाळ वाढवण्यात न आल्याने 'एमसीए'च्या खात्यातून पैसे काढण्यासाठी स्वाक्षरी करणारी एकही अधिकृत व्यक्ती 'एमसीए'कडे उपलब्ध नाही. परिणामी बिल मंजूर करणे, व्हेंडर्सची नियुक्ती करणे, मॅचचं आयोजन करणे ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच आयोजित करणे 'एमसीए'ला सद्यस्थितीत तरी शक्य नाही.
हेही वाचा-
वेस्ट इंडिजविरूद्धची मुंबई वन डे संकटात!
'वन डे'त विराटचं कमबॅक, पंतलाही चान्स!