भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर याचा पुतण्या अरमान जाफरने (२०) सी.के.नायडू ट्राॅफी (अंडर-२३ टूर्नामेंट)मध्ये दुसरं तिहेरी शतक झळकावत नवीन इतिहास रचला. अरमानने मुंबईकडून खेळताना ३६७ चेंडूत नाबाद ३०० धावांचा डोंगर रचला. यामध्ये २६ चौकार आणि १० षटकारांचा समावेश आहे. सौराष्ट्रविरूद्ध खेळण्यात आलेल्या या सामन्यात केवळ अरमानच्या फलंदाजीचीच चर्चा हाेती.
अरमान फलंदाजीसाठी क्रिजवर उतरला तेव्हा सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी मुंबईची अवस्था बिकट करून टाकली होती. मुंबईने केवळ १२ धावांमध्ये २ गडी गमावले होते. परंतु चौथ्या क्रमांकावर उतरलेला अरमान वेगळ्याच फाॅर्ममध्ये होता. अरमानला रुद्र धांडे याची चांगली साथ मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २८१ धावांची भागीदारी केली. रुद्रने बाद होण्याआधी १६६ धावा केल्या.
रुद्र बाद झाल्यानंतरही अरमानने धाव जमवणं सुरूच ठेवलं होतं. त्याने सौराष्ट्रच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. यापुढील खेळीत त्याला शम्स मौलानी (८७) आणि सिद्धार्थ आकरे (८९) यांचीही चांगली साथ मिळाली. मात्र दुसऱ्या बाजूला विकेट पडत होते आणि अरमान धावा जमवत होता.
अरमानने तिहेरी शतक झळकावताच मुंबईच्या कर्णधाराने डाव घोषित केला. इंडियन प्रीमियर लिगमध्ये अरमान किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी महत्त्वाचा खेळाडू बनू शकतो. त्याशिवाय इतर फ्रँचायजी देखील त्याच्यावर नजर ठेवून आहेत.