एम. के. क्रिकेट अकादमीविरुद्धच्या तीन अंतिम सामन्याच्या मालिकेतील दोन सामने जिंकून यजमान मुंबई क्रिकेट अकादमीने १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत बाजी मारत एसआरटी चषकावर आपलं नाव कोरलं. तब्बल १२ संघांचा सहभाग असलेल्या मुंबई क्रिकेट अकादमी आयोजित एसआरटी चषक स्पर्धेची अंतिम लढत तीन सामन्यांची खेळवण्यात आली. या स्पर्धेतील एक सामना ४० षटाकांचा आणि दोन सामने टी-२० क्रिकेटचे खेळवण्यात आले. या तीन सामन्यांमध्ये एका शतकासह १८९ धावा करणाऱ्या कुणाल नवरंगेला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
४० षटकांच्या पहिल्या सामन्यात मुंबई क्रिकेट अकादमीने एम. के. क्रिकेट अकादमीचा १६७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्याच्या मालिकेत आघाडी मिळवली. कुणाल नवरंगेच्या १३७ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबई क्रिकेट अकादमीनं प्रथम फलंदाजी करत ३८० धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरादाखल एम के क्रिकेट अकादमीच्या क्रिधांत नाईक (नाबाद ४३), अंश गुप्ता (३२) आणि सोहम कदमचा (२३) अपवाद वगळता इतर फलंदाजांना छाप पाडता आली नाही.
एम. के. क्रिकेट अकादमीनं पहिला टी-२० सामना पाच विकेट्सनी जिंकत चांगलीच चुरस निर्माण केली. मुंबई क्रिकेट अकादमीचं १०१ धावांचं आव्हान एम. के. क्रिकेट अकादमीनं आकाश गौडा आणि तुषार टंकच्या फलंदाजीच्या जोरावर पूर्ण केलं.
निर्णायक लढतीत मुंबई क्रिकेट अकादमीनं शर्वज दुर्वेचं अर्धशतक (६६) आणि कुणाल नवरंगेच्या ४६ धावांच्या खेळीमुळे २० षटकांत ९ बाद १७७ धावांचा पल्ला गाठला. हे उद्दिष्ट गाठताना पार्थ घोणेच्या चार विकेट्समुळे एम. के. संघाला अवघ्या २३ धावांमध्ये गुंडाळत मुंबई
क्रिकेट अकादमीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.
हेही वाचा -