सातव्यांदा आशिया कप पटकावल्यावर आता टीम इंडियाला वेध लागलेत ते वेस्ट इंडिजसोबतच्या कसोटी मालिकेचे. त्यानुसार ४ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी घोषणा करण्यात येणार असून त्यात मुंबईकर फलंदाज पृथ्वी शाॅ आणि कर्नाटकच्या मयांक अग्रवालचा समावेश असू शकतो. वेस्ट इंडिजविरोधात शाॅ भारतातर्फे कसोटीत पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. आगामी आॅस्ट्रेलिया दौऱ्याकडे पाहता या संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचं लक्ष असणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात सुमार कामगिरी करणारा सलामीचा फलंदाज मुरली विजयला निवड समिती बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. त्याच्या ऐवजी १८ वर्षांच्या पृथ्वीला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लड दौऱ्यात पृथ्वी टीम इंडियाचा हिस्सा होता. परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने त्याला केवळ ड्रेसिंग रुमचाच अनुभव घ्यावा लागला.
पृथ्वी के. एल. राहुलसोबत सलामीला येण्याची शक्यता आहे. के. एल. राहुलने इंग्लंड दौऱ्यात झळकावलेलं शतक (१४९) त्याच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला शिखर धवनऐवजी संधी मिळू शकते. शिखर धवनने आशिया कपमध्ये दमदार कामगिरी केली असली, तरी इंग्लंड दौऱ्यात ८ इनिंगमध्ये त्याला केवळ १६२ रन करता आले होते.
दुखापतग्रस्त इशांत शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन या दोघांनी फिटनेट टेस्ट पास केल्यास त्यांचीही वर्णी संघात लागू शकते. तर आशिया कप विजेता कप्तान रोहित शर्मा याला देखील यष्टीरक्षक ऋषभ पंत सोबत सहाव्या क्रमांकासाठी निवडण्यात येऊ शकतं. रवींद्र जाडेजा कुलदीप यादवसोबत भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांचा देखील संघात समावेश असेल.
हेही वाचा-
मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा धवल कुलकर्णीकडे
शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या यांची अाशिया चषकातून माघार